काही दिवसापूर्वी बीएसएफ जवानांना घेऊन जाणाऱ्या रेल्वेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये रेल्वेची अवस्था खराब असल्याचे दिसत आहे. सीमा सुरक्षा दलाचे (BSF) सुमारे १२०० सैनिक अमरनाथ यात्रेसाठी ड्युटीवर जात होते. हे सर्व सैनिक गुवाहाटीहून काश्मीरला जात होते आणि त्यासाठी रेल्वेकडून विशेष ट्रेनची मागणी करण्यात आली होती. बीएसएफने दोन एसी सेकंड क्लास कोच, दोन एसी थर्ड क्लास कोच, १६ स्लीपर कोच आणि चार जनरल स्लीपर कोचची मागणी केली होती. त्यानंतर, भारतीय रेल्वेने त्यांना दिलेल्या ट्रेनची अवस्था खूपच वाईट होती. ट्रेनच्या बोगीही खूप वाईट होत्या.
रेल्वे खराब आणि त्यामध्ये घाणीचे साम्राज्य होते. ती रेल्वे ७२ तास उशिराने धावत असल्याचा आरोपही करण्यात आला होता. यानंतर, बीएसएफने आगरतळा स्टेशन मॅनेजरकडे तक्रार पाठवली. रेल्वेने या प्रकरणाची प्राथमिक चौकशी केली आणि निष्काळजीपणाबद्दल चार अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे.
या ट्रेनचा व्हिडीओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला. यामध्ये ट्रेनच्या खिडक्या तुटलेल्या आणि दरवाजे जाम असल्याचे दिसून आले. शौचालयेही खूप घाणेरडी होती आणि सीट्स तुटलेल्या होत्या. अनेक डब्यांमध्ये वीज कनेक्शन नव्हते आणि ट्रेनमध्ये झुरळे फिरत होते.
कारवाई करण्यात आली- अश्विनी वैष्णव
सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होताच रेल्वेने तात्काळ कारवाई केली. बीएसएफच्या तक्रारीनंतर रेल्वेने कारवाई केली. नंतर सर्व सैनिकांसाठी दुसऱ्या ट्रेनची व्यवस्था करण्यात आली. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनीही या प्रकरणाबाबत निवेदन दिले.
या प्रकरणाबाबत कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये ४ अधिकारी दोषी आहेत, त्यांना निलंबित करण्यात आले आहे.
व्हायरल व्हिडीओवर रेल्वेचे स्पष्टीकरण
ईशान्य सीमा रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी के.के. शर्मा यांनीही या प्रकरणाबाबत निवेदन दिले. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणारे डबे प्रवाशांसाठी नव्हते. ते देखभालीसाठी ट्रेनमध्ये जोडले होते. या डब्यांवर स्पष्टपणे लिहिले होते की हे प्रवाशांसाठी नाहीत आणि ते सर्व्हिसिंगसाठी नेण्यात आले होते.