हरीश गुप्ता, नवी दिल्ली : मतदानोत्तर चाचण्यांच्या आधारे अनेक वृत्तवाहिन्या नरेंद्र मोदी यांच्या गळ्यात दिल्लीच्या सत्तेेची माळ घालून मोकळ्या झाल्या असतानाच भाजपाध्यक्षपदी राजनाथसिंह हेच कायम राहणार असल्याचे संकेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेतृत्वाने दिले आहेत़.आपण पक्षाध्यक्षपदाचा उर्वरित दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू, असे खुद्द राजनाथ सिंह सांगत असले तरी त्यांची सुप्त महत्त्वाकांक्षा लपून राहिलेली नाही़ मोदी सरकारमध्ये येण्यास राजनाथ यांनी स्पष्ट नकार दिलेला नाही, असे त्यांचे समर्थक खासगीत सांगत आहेत़ पक्षाध्यक्ष म्हणून आडवाणी आणि पंतप्रधान म्हणून अटलबिहारी वाजपेयी यांनी ज्या प्रकारे सलोख्याने काम केले, तसे मोदींसोबत काम करण्याचा राजनाथ यांचा मानस आहे. यामुळे साहजिकच उत्तर प्रदेशातील एक वजनदार नेते गृहमंत्रालयासोबत उपपंतप्रधानपद मिळण्याची आस बाळगून आहेत़राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेतृत्वाने मात्र स्वत: पडद्याआड राहून नरेंद्र मोदींना सर्वाधिकार देण्याचा निर्णय घेतला आहे. सरसंघचालक मोहन भागवत यांनी अलीकडे मोदींची व्यक्तिश: भेट घेतली आणि यानंतर पक्षाच्या चार वरिष्ठ नेत्यांशीही त्यांनी सल्लामसलत केली़ या बैठकीत भागवतांनी मोदींवर विश्वास असल्याचे बोलून दाखवल्याचे समजते़ मोदी एक सच्चे स्वयंसेवक असून त्यांचा आपल्याला अभिमान असल्याचे सांगत, मोदी जो काही निर्णय घेतील, तो योग्य असेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.मोदी पंतप्रधान झाल्यास त्यांच्यावर भारी पडतील अशी दोन समांतर सत्ताकेंद्र संघाला नको आहेत़ रालोआ सरकारमध्ये वाजपेयी पंतप्रधान असताना संघ लालकृष्ण आडवाणींच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचला़ यावेळी मात्र अशी शक्यता नाही़ राजनाथ यांना मोदी सरकारमध्ये न घेतल्यास नितीन गडकरी यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे़ कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्यास मोदींप्रमाणेच गडकरींचाही केंद्रातील सरकारमध्ये काम करण्याचा पहिला अनुभव असेल आणि त्यामुळे मोदी आणि गडकरी यांच्यात काम सहज सोपे होईल, असे आडाखे आहेत़मोदी सरकारमध्ये अरुण जेटली क्रमांक दोनच्या स्थानावर असतील, असेही संकेत आहे़ जेटली हे दिल्लीतील मोदींचे कान आणि डोळे आहेत़ मोदींचे निकटस्थ मानले जाणार्या अमित शहांसोबतही त्यांनी काम केले आहे़ मोदी आणि जेटलींमध्ये चांगले संबंध आहेत़ पक्ष आणि सरकारबाबतच्या प्रत्येक निर्णयासंदर्भात मोदी त्यांच्याशी संवाद साधतात़ एवढेच नव्हे तर, संघाबाहेर अशी व्यक्ती जिच्यावर मोदी विश्वास ठेवू शकतात ते अरुण जेटली हेच आहे़त जेटलींना अर्थमंत्रालयात स्वारस्य आहे़ मंत्रिमंडळ स्थापनेत महत्त्वाची भूमिका राहणार असलेल्या जेटलींच्या या मागणीवर कालांतराने निर्णय होईलच़ जेटली उपपंतप्रधान झाले नाहीत तरीही मोदी सरकारमध्ये त्यांचे क्रमांक दोनचे स्थान अढळ मानले जात आहे़ अशा स्थितीत मोदींची खरी अडचण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी आहेत़ या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा आताशा कुणापासून लपून राहिलेली नाही़ या पार्श्वभूमीवर जोशींच्या गळ्यात लोकसभाध्यक्षपदाची माळ टाकली जाण्याचे संकेत आहेत़ आडवाणींबाबत मात्र अद्यापही कुठलाही निर्णय झालेला नाही़ केवळ पांढरा हत्ती ठरलेला नियोजन आयोग गुंडाळण्याची मोदींची योजना आहे़ मोदींचे विश्वासू अमित शहा यांना पक्षातच ठेवले जाणे अपेक्षित आहे़ येत्या काळात विधानसभा निवडणुकांना सामोरे जाणार्या सहा राज्यांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात येईल, अशी शक्यता आहे़ या अनुषंगाने बुधवारी गांधीनगर येथे बैठक होत आहे़ मोदींच्या अध्यक्षतेखालील या बैठकीसाठी भाजपाचे अनेक बडे नेते गांधीनगरकडे रवाना झाले आहेत़.
भाजपात मोर्चेबांधणी
By admin | Updated: May 14, 2014 04:35 IST