नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीत नितीशकुमार हेच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार राहणार असल्याची औपचारिक घोषणा प्रस्तावित जनता परिवाराचे अध्यक्ष मुलायमसिंह यांनी सोमवारी केली. राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांच्या विरोधामुळे युती होणार की नाही, असा संभ्रम निर्माण झाला असतानाच मुलायमसिंह यांनी हा मुद्दा निकाली निघाल्याचे संकेत दिले आहेत. जातीयवादी शक्तींना पराभूत करण्यासाठी हे दोन नेते एकजुटीने लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.लालूप्रसाद यादव आणि नितीशकुमार यांनी रविवारी दिल्लीत चर्चा करीत राजद- संजद (जेडी- यू) युतीचा मार्ग प्रशस्त केला होता. सोमवारी मुलायमसिंह यादव यांनी एका पत्रपरिषदेत नितीशकुमार यांचे नाव जाहीर केले तेव्हा लालूप्रसाद यादव, संजदचे अध्यक्ष शरद यादव, समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते राम गोपाल यादव उपस्थित होते. राजद आणि संजदचे विलीनीकरण झाले नसतानाही या दोन पक्षांमध्ये जागावाटपाबाबत कोणतीही समस्या उद्भवणार नाही. संघर्षाची स्थिती उद्भवल्यास माझाच निर्णय अंतिम राहील, असे मुलायमसिंह यांनी स्पष्ट केले. लालूप्रसाद यांच्या कुटुंबातील कुणीही लढण्यास इच्छुक नाही, असेही त्यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)एप्रिलमध्ये जनता परिवारातील सहा पक्षांच्या विलीनीकरणाची घोषणा झाली होती. प्रस्तावित जनता परिवाराची धुरा मुलायमसिंग यांच्याकडेच सोपविण्यात आली होती. प्रत्यक्षात त्यांनी पत्रपरिषदेत विलीनीकरणाच्या मुद्यावर भाष्य टाळले.——————————————————लालूप्रसाद म्हणाले, सर्व प्रकारचे विष घेण्याची तयारीलालूप्रसाद आणि नितीशकुमार हे एकेकाळी कट्टर विरोधक मानले जात होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ४० जागा जिंकत दोघांच्याही पक्षांना भुईसपाट केल्यामुळे जनता परिवाराच्या निमित्ताने त्यांच्यात एकजूट होणे ही अपरिहार्यता मानली जात आहे. नितीशकुमार यांच्या नेतृत्वाला मान्यता दिल्याबद्दल लालूप्रसाद म्हणाले की, सर्व प्रकारचे विष घेण्याची माझी तयारी आहे. जातीयवादाचा कोब्रा आम्हाला चिरडून टाकायचा आहे. एकजुटीने आम्ही त्यांना उद्ध्वस्त करू. भाजपला बिहारमधून हद्दपार करू. मी आणि नितीश एकाच कुटुंबातील आहोत. आमच्यात मतभेद आणि लढाया झाल्या. आम्ही परस्परांवर आरोप केले. बिहारमधील राज्यसभा निवडणुकीच्यावेळी जेडीयूमध्ये फूट पडल्याने भाजपला रोखण्यासाठी मी नितीशकुमार यांची भेट घेतली. मी त्यांना समर्थन जाहीर केले. जातीयवादी शक्तींनी मीडियातून सर्वप्रकारच्या अफवा पसरविल्या. आम्ही एकत्र येऊ शकत नाही, असा त्यांचा दावा होता.——————————————-आमचे मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून नितीशकुमार यांचे नाव समोर केल्याबद्दल मी मुलायमजींचे आभार मानतो. मी निवडणूक लढू शकत नाही. माझी पत्नी किंवा कुटुंबातील कुणालाही त्यात स्वारस्य नाही. माझी मुले लहान आहेत. मुख्यमंत्रिपदासाठी आमच्या पक्षाकडून किंवा कुटुंबातून कोणताही उमेदवार असणार नाही. - लालूप्रसाद यादव, अध्यक्ष राजद.——————————-लालूप्रसाद आणि नितीशकुमार यांच्यातील ऐक्यामुळे मला आनंद झाला आहे. नितीशकुमार हे बिहारमध्ये मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार राहतील. लालूजींनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला आहे. लालूजींनी प्रचाराचे आश्वासन दिले आहे. कोणतेही मतभेद नाहीत. मतभेदांना थारा दिला जाणार नाही. जातीयवादी शक्तींना उखडून फेकण्यासाठी हे दोन नेते एकत्र आले आहेत. - मुलायमसिंग यादव, अध्यक्ष, समाजवादी पक्ष.
बिहारमध्ये नितीशकुमार मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार
By admin | Updated: June 9, 2015 01:03 IST