उत्तर प्रदेशमधील आग्रा जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. येथे यमुना नदीमध्ये बुडाल्याने एकाच कुटुंबातील चार मुलींचा मृत्यू झाला. तर दोन मुलींची प्रकृती गंभीर आहे. त्यांना उपचारांसाठी एसएन मेडिकल कॉलोजमध्ये दाखल करण्यात आले आहे. ही घटना सिकंदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील स्वामी नगला गावाजवळ घडली आहे.
वाढत्या उकाड्यापासून दिलासा मिळावा यासाठी या मुली यमुना नदीच्या किनाऱ्यावर पोहोचल्या होत्या. आंघोळ करण्यापूर्वी या मुलींनी मोबाईलमधून रीलसुद्धा तयार केलं होतं. ही रील नदीच्या किनाऱ्यावर उभी राहून बनवण्यात आली होती.
नदीत उतरल्यावर मुली पाण्यात पुढे उतरल्या. मात्र पाऊल पुढे टाकताच त्यांचा पाय खड्ड्यात पडला आणि त्या बुडू लागल्या. जोपर्यंत त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले तोपर्यंत चारही जणांचा मृत्यू झाला होता. तर दोघांची प्रकृती बिकट आहे.
मृत मुलींचं वय हे १० ते १८ वर्षांदरम्यान, असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच त्या सर्वजणी नगला स्वामी येथील रहिवासी होत्या. तर दोन मुली आग्रा येथील रामी नगला येथून आपल्या नातेवाईकांना भेटण्यासाठी आल्या होत्या. मृतांची ओळख दिव्या (१४), संध्या (१२), शिवानी (१७) आणि नैना (१४) अशी पटवण्यात आली आहे. तर वाचवण्यात आलेल्या दोन मुलींची ओळख सोनम आणि मुस्कान अशी पटली आहे.