अकोला: न्यायालयाने एका डॉक्टरविरुद्ध बजावलेल्या अटक वॉरंटची तामील न करण्यासाठी आर्थिक रकमेची मागणी करणार्या रामदासपेठ पोलिस ठाण्यातील दोन पोलिस कर्मचार्यांविरुद्ध पोलिस अधीक्षक वीरेंद्र मिश्र यांनी तडकाफडकी कारवाई करून त्यांची पोलिस मुख्यालयात बदली केली; परंतु रामदासपेठ ठाणेदाराच्या संमतीने हा प्रकार घडल्यानंतरही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही. कर्मचार्यांवर कारवाई, तर ठाणेदाराचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरातील एका डॉक्टरविरुद्ध न्यायप्रविष्ट असलेल्या एका गुन्ह्यात न्यायालयाने बिगर जमानती वॉरंट काढला. अंमलबजावणीसाठी हा वॉरंट रामदासपेठ पोलिस ठाण्यात पाठविला. रामदासपेठचे ठाणेदार विनोद ठाकरे यांनी हा बिगर जमानती वॉरंट एका कर्मचार्याकडे अंमलबजावणीसाठी दिला; परंतु या कर्मचार्याने हा वॉरंट अंमलबजावणीसाठी घेतला नाही. त्याच्याऐवजी दुसर्याच कर्मचार्याने वॉरंट घेतला. एका पोलिस कर्मचारी सहकार्याला सोबतीला घेतले. दोघा पोलिस कर्मचार्यांनी यासंदर्भात ठाणेदार विनोद ठाकरे यांच्यासोबत चर्चासुद्धा केली. त्यानंतर दोन्ही पोलिस कर्मचारी संबंधित डॉक्टरकडे गेले. त्याला तुमच्याविरुद्ध पकड वॉरंट असल्याचे सांगितले आणि हा पकड वॉरंट तामील न करण्यासाठी दोघांनी आर्थिक रकमेची मागणी केली. त्यानंतर संबंधित डॉक्टरने वरिष्ठ पोलिस अधिकार्यांना फोनवरून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली. डॉक्टरच्या तक्रारीची तातडीने दखल घेत, त्या दोन पोलिस कर्मचार्यांची तडकाफडकी रामदासपेठ पोलिस ठाण्यातून पोलिस मुख्यालयात बदली केली. यापूर्वी पोलिस मुख्यालयातील दोन पोलिस कर्मचार्यांना रामदासपेठ पोलिस ठाण्यात तात्पुरते पाठविण्यात आले होते. त्यांनाही वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी पोलिस मुख्यालयात बोलावून घेतल्याने त्यांचाही या घटनेशी संबंध असावा, असा अंदाज काढून पोलिस वर्तुळात चार पोलिस कर्मचार्यांची मुख्यालयात बदलीची चर्चा रंगली. हा प्रकार ठाणेदार विनोद ठाकरे यांच्या संमतीनेच घडल्याचे बोलले जाते; परंतु वरिष्ठ अधिकार्यांनी त्यांच्यावर अद्यापही कोणतीही कारवाई केली नाही.** प्रकरणाची चौकशी सुरूडॉक्टरविरुद्ध न्यायालयाच्या पकड वॉरंटची तामील न करण्यासाठी आर्थिक रकमेची मागणी करणार्या दोन पोलिस कर्मचार्यांची पोलिस मुख्यालयात बदली करून त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. तसेच ठाणेदाराचीसुद्धा चौकशी करण्यात येत असल्याची माहिती आहे. ** न्यायालयाच्या पकड वॉरंट तामील न केल्याप्रकरणाची संबंधित पोलिस कर्मचारी व ठाणेदाराची चौकशी करण्यात येत आहे. यापूर्वीच दोन कर्मचार्यांची बदली केली. चौकशीमध्ये ठाणेदार दोषी आढळल्यास त्यांच्यावरसुद्धा कारवाई करण्यात येईल. - वीरेंद्र मिश्र, पोलिस अधीक्षक
रामदासपेठच्या त्या दोन कर्मचार्यांवर कारवाई; ठाणेदाराचे काय? पकड वॉरंटची तामील न करणे येणार अंगलट
By admin | Updated: May 20, 2014 23:59 IST