ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - असहिष्णूतेच्या मुद्यावर आमिर खानपेक्षा भाजपाची भूमिका जास्त योग्य असल्यावर एका ऑनलाइन पोलमध्ये शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. पत्नी किरणने देश सोडण्याबाबत विचारणा केली होती या आमिर खानच्या वक्तव्यानं देशात पुन्हा एकदा रान उठवलं आहे. आपल्या वक्तव्यावर ठाम राहणा-या आमिरने दरम्यान आपण भारत कधीही सोडणार नसल्याचा खुलासा केला आहे.
तर भाजपाचे नेते शहानवाझ हुसेन यांनी मुस्लीमांसाठी भारताइतका तुल्यबळ देश जगात नसल्याचे सांगताना मुस्लीमांसाठी हिंदूपेक्षा चांगला शेजारी असू शकत नाही अशी प्रतिक्रिया दिली होती. टाइम्स ऑफ इंडियाने ऑनलाइन पोलच्या माध्यमातून वाचकांना भाजपाच्या या प्रतिक्रियेबाबत मत विचारलं. तब्बल ८६.५ टक्के मतदात्यांनी भाजपाच्या बजुने कौल दिला आहे. २२,६९४ ऑनलाइन वाचकांनी या पोलमध्ये भाग घेतला, ज्यापैकी १९,६२७ वाचकांनी शहानवाझ हुसेन बरोबर बोलत असल्याचे सांगितले तर २,७४७ जणांनी प्रतिकूल मत नोंदवले आहे. तर ३२० जण तटस्थ राहिले.
आमिर खानच्या बाजुने या वादात अपेक्षेप्रमाणे काँग्रेस राहिली असली तरी बॉलीवूडमधल्या अनेकांनी मात्र आमिर खानच्या वक्तव्यास असहमती दर्शवल्याचेही या निमित्ताने दिसून आले आहे.