महिलांच्या असुरक्षिततेत मुंबईचा द्वितीय क्रमांक
ऑनलाइन टीम
चेन्नई, दि. १ - देशात दिवसेंदिवस महिलांच्या असुरक्षतेत भर पडताना दिसत असून देशात दररोज ९३ महिलांवर बलात्कार होत असल्याची ताजी आकडेवारी समोर आली आहे. राष्ट्रीय गुन्हे ब्यूरोने प्रसिध्द केलेल्या आकडेवारीनुसार देशात दिल्ली शहर हे महिलांसाठी सर्वात असुरक्षित शहर असून त्याखालोखाल मुंबई शहराचा क्रमांक आहे.
नॅशनल क्राईम रेकॉर्डस् ब्यूरो (एनसीआरबीने )भारतातील गुन्हयासंबंधी आकडेवारी प्रसिध्द केली आहे. या आकडेवारीवरून दिल्ली, मुंबईपाठोपाठ जयपूर आणि संस्कृती जपणा-या पुणे शहराचाही उल्लेख करण्यात आला आहे. २०१२ साली दिल्लीत ५८५ महिलांवरील बलात्काराच्या घटना घडल्या होत्या तर हाच आकडा २०१३ साली १ हजार ४४१ आकड्यांपर्यंत पोहोचला आहे. मुंबईत २०१३ साली ३९१, जयपूर १९२ तर पुण्यात १७१ महिलांवर बलात्कार झाल्याची माहिती आहे. २०१३ साली मध्यप्रदेशात सर्वाधिक बलात्काराच्या घटना घडल्या असून एप्रिलपर्यंत ४ हजार ३३५ घटना तसेच एका १४ वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. मध्यप्रदेशापाठोपाठ राजस्थान ३२८५, महाराष्ट्र ३०६३ आणि उत्तर प्रदेशात ३०५० इतक्या मोठया प्रमाणात बलात्काराच्या घटना समोर आल्या आहेत. सर्वाधिक कमी बलात्काराच्या घटना या तामिळनाडूत ९२३ घडल्या आहेत. ९४ टक्के बलात्कार हे ओळखीच्या व्यक्तीकडून, शेजारील व्यक्तीकडून, नातेवाईक, आणि त्यानंतर घरातील व्यक्तीकडून होत असल्याची आकडेवारी एनसीआरबीने प्रसिध्द केली आहे.