संत कबीरनगर (उ. प्र.) : दिल्लीहून गोरखपूरकडे निघालेल्या गोरखधाम एक्स्प्रेसने सोमवारी उत्तर प्रदेशच्या संत कबीरनगर जिल्ह्यातील चुरेब रेल्वेस्थानकावर उभ्या असलेल्या मालगाडीला मागून जोरदार धडक दिली़ अपघातात कमीत कमी १४ जण ठार, तर १०० हून अधिक जखमी झाले़ दरम्यान, राज्याच्या गृह विभागाने या अपघातात ४० जण मृत्यूमुखी पडल्याची भीती व्यक्त केली आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आदींनी या अपघातावर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे़ मोदींनी कॅबिनेट सचिवांना फोन करून अपघाताबद्दल जाणून घेतले़ सोमवारी सकाळी १० वाजता बस्ती व गोरखपूर जिल्ह्यादरम्यानच्या चुरेब रेल्वेस्थानकानजीक हा अपघात झाला़ गोरखपूर एक्स्प्रेस आली आणि तिने मागून मालगाडीला जोरदार धडक दिली़ धडक इतकी भीषण होती की, एक्स्प्रेसच्या इंजिनचे दोन तुकडे झाले़ नंतरचा पहिला डबा पूर्णपणे चपटा झाला व मालगाडीवर चढला़ अन्य पाच डबे रुळावरून घसरून पूर्णपणे चपटे झाले़ प्रारंभी अपघातात, २० जण ठार झाल्याचे स्थानिक प्रशासनाकडून सांगण्यात आले़ मात्र नंतर त्यांनी घूमजाव केले़ रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष अनुनेंद्र कुमार यांनी या अपघातात १४ जण ठार झाले असून हा आकडा वाढू शकतो, असे ते म्हणाले. अपघातामागचे नेमके कारण कळू शकले नाही़ चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले़ अपघातात अन्य १०० जण जखमी झाले असून त्यांना संत कबीरनगर व बस्ती येथील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे़ राज्य सरकारने जखमींना मोफत उपचाराची घोषणा केली आहे़ मृतांच्या कुटुंबियांना रेल्वेची मदत जिल्हाधिकारी भरत लाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात गोरखधामच्या सहा डब्यांचे नुकसान झाले आहे़ या डब्यांमध्ये मृतदेह असण्याची शक्यता आहे़ रेल्वेने मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १ लाख, गंभीर जखमींना प्रत्येकी ५० हजार व किरकोळ जखमींना प्रत्येकी १० हजार रुपयांची मदत जाहीर केली़अपघातानंतर या मार्गावरील रेल्वे वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली़ त्यामुळे अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले़ (वृत्तसंस्था)
रेल्वे अपघातात १४ मृत्यूमुखी
By admin | Updated: May 27, 2014 05:51 IST