ओडिशातील गजपती जिल्ह्यात गुरुवारी होमगार्ड भरतीदरम्यान दुर्दैवी घटना घडली. शारीरिक चाचणीदरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर, पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. भरती प्रक्रियेदरम्यान २ किमीच्या शर्यतीदरम्यान ही धक्कादायक घटना घडली.
सुलंत मिशाल असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो गजपती जिल्ह्यातील रामगिरी पोलीस ठाणे परिसरातील परिसाल गावचा रहिवासी आहे. दरम्यान, होमगार्ड भरतीसाठी गुरुवारी सकाळी बेट्टागुडा परिसरात शर्यत आयोजित करण्यात आली होती, जिथे उमेदवारांना राणीपेठ ते पद्मपूर असा २ किमी अंतर गाठायचे होते.
मिळालेल्या माहितीनुसार, सुलंत मिशालने शर्यत पूर्ण केली. परंतु, शर्यत संपल्यानंतर काही मिनिटांतच तो जमिनीवर कोसळला आणि बेशुद्ध पडला. त्याला तातडीने परलाखेमुंडीच्या जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तिथे डॉक्टरानी त्याला मृत घोषित केले. पाच जणांची प्रकृतीही बिघडली, त्यानंतर त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. एका उमेदवाराला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून इतर चार जणांवर उपचार सुरू आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेने इतर उमेदवारांमध्ये आणि अधिकाऱ्यांमध्ये घबराट पसरली. भरती प्रक्रिया तात्काळ थांबवण्यात आली.
गजपतीचे एसपी जतिन पांडा म्हणाले की, "दोन महिन्यांपूर्वी १४४ पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. या भरतीसाठी ४००० हून अधिक उमेदवारांनी आपली नावे नोंदवली. यातील १२०० हून अधिक उमेदवारांची नंतर निवड झाली. त्यासाठी शारीरिक चाचणी घेण्यात आली. पुरुष उमेदवारांना १० मिनिटांत आणि महिला उमेदवारांना १२ मिनिटांत २ किमीची शर्यत पूर्ण करायची होती."