घोटी : इगतपुरी तालुक्यातील तब्बल चौदा गावांना घोटीशी जोडणाऱ्या प्रमुख रस्त्यावर असलेल्या पुलाचे काम पावसाळा नव्हे तर दिवाळी उलटून गेल्यानंतरही अपूर्णच राहिल्याने या चौदा गावांतील नागरिकांना या कठडे नसलेल्या पुलावरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. दरम्यान, या पुलाचा उर्वरित निधी इतरत्र वळविल्याने हे काम अपूर्ण राहिले असल्याची कबुली सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली, तर शासनाने हे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी या भागातील नागरिकांकडून होत आहे.याबाबत वृत्त असे की, घोटीपासून जवळच असलेल्या दारणा नदीवरील जुना पूल सातत्याने पाण्याखाली जात असल्याने शासनाने या ठिकाणी नवीन पूल मंजूर केला होता. यानुसार या पुलाचे काम गेल्या वर्षभरापूर्वी सुरू करण्यात आले होते. हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे, असे निर्देश शासनाच्या वतीने संबंधित ठेकेदाराला देण्यात आले होते. हे काम करताना संबंधित ठेकेदाराने जुना पूल नष्ट करीत वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता केला होता; मात्र पहिल्याच पुराच्या पाण्यात हा पर्यायी मार्ग वाहून गेल्याने या भागातील चौदा गावांचा घोटीशी संपर्कतुटला होता.या प्रकारानंतर खासदार हेमंत गोडसे आणि आमदार निर्मला गावित यांनी या पुलाच्या कामाची पाहणी करीत पुलाचे रखडलेले काम तत्काळ पूर्ण करण्याच्या सूचना कार्यकारी अभियंत्यासह ठेकेदाराला केल्या होत्या. मात्र लोकप्रतिनिधींच्या सूचना पायदळी तुडवीत हे काम संथगतीने करण्यात आले होते.सदरच्या अपुऱ्या कामामुळे या भागातील नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याने हे काम तातडीने पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (वार्ताहर)
निधीअभावी रखडले पुलाचे काम
By admin | Updated: November 16, 2015 21:56 IST