नाशिक : पु. ल. देशपांडे यांना सरस्वतीचा असा वरदहस्त लाभलेला होता की, एखाद्या शब्दावर कोटि करणे म्हणजे त्यांना लाभलेली दैवी देणगीच म्हणावी लागेल. त्यामुळेच हजरजबाबी हा शब्दही ‘पुलं’च्या बाबतीत कमी पडणारा आहे. त्यांनी अशी अनेक अक्षरक्षितिजे निर्माण केली असून, त्यांच्या शब्दाशब्दाने आनंदाची पाऊलवाट तयार झाली, असे प्रतिपादन प्राचार्य वेदश्री थिगळे यांनी केले.कुसुमाग्रज स्मारकात संवादतर्फे पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यावर आधारित ‘कोट्यधीश पु.ल.’ विषयावर व्याख्यान देताना त्या बोलत होत्या. व्यासपीठावर संवाद संस्थेचे अध्यक्ष अभिमन्यू सूर्यवंशी, उपाध्यक्ष डॉ. बाळासाहेब गुंजाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. वेदश्री थिगळे पुढे म्हणाल्या की, पु. लंच्या सहवासात जो आला, त्याला त्यांनी निखळ आनंद दिला.या व्याख्यानानंतर कथाकथनकार सुरेखा बोºहाडे यांचे कथाकथन झाले. अतिशय ओघवत्या शैलीत त्यांनी कथा सादर केली. पुलंनी अनेक वाङमय प्रकाराला अक्षरसूत्रे पुरवलेली होती. त्यांच्या साहित्य प्रवासाला सलाम करावा अशीच त्यांची संपदा असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
पुलंचे शब्दन् शब्द म्हणजे आनंदाची पाऊलवाट : वेदश्री थिगळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2019 00:17 IST