लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : नाशिकच्या साहित्य संमेलनासाठी सर्व प्रकारची सज्जता करण्यात येत असून, तयारीला वेग देण्यात आला आहे. कोरोनाबाबत परिस्थिती बघूनच सर्व निर्णय घेण्यात येणार असून, सर्व प्रकारची दक्षता, स्वच्छता, फवारणी, सॅनिटायझेशनला प्राधान्य देऊनच संमेलनाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री आणि स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी सांगितले.
भुजबळ फार्म येथे झालेल्या पत्रकार परिषदेत भुजबळ यांनी ही माहिती दिली. साहित्य संमेलन स्थळाला कुसुमाग्रज नगरी नाव देण्यापासून ते विज्ञान साहित्याचा समावेश असलेल्या स्मरणिकेच्या कामापर्यंत सर्व बाबींचा अंतर्भाव त्यात करण्यात आला आहे. संमेलनाच्या आयोजनात जिल्ह्यातील लेखकांच्या साहित्याचे, तसेच विविध कलाकारांच्या कलांचे प्रदर्शन, प्रात्यक्षिक दर्शन केले जाणार आहे. त्याशिवाय यंदाच्या संमेलनापासून प्रथमच बालकुमार साहित्य मेळाव्याचेदेखील दर्जेदार आयोजन केले जाणार आहे. कोरोनाबाबत सर्व परिस्थिती बघून योग्य ते निर्णय घेतले जाणार आहेत. मात्र, संमेलनात गर्दी कमी व्हावी, म्हणून कोणत्याही उपाययोजना करण्यात येणार नाहीत. संमेलनाला येऊ नका, असे कुणालाही सांगता येत नाही. त्या पार्श्वभूमीवर कोरोनामुळे स्वच्छतेच्या, सुरक्षिततेच्या अधिक उपाययोजना कराव्या लागणार असल्याने संमेलन आयोजनाच्या खर्चातही वाढ होणार आहे. त्यामुळेच आम्ही सर्व आमदारांना निधीबाबत विनंती केली आहे. तो निधी देण्याबाबत कुणात एकमत नसले तरी त्याबाबत जबरदस्ती केलेली नसल्याचेही भुजबळ यांनी नमूद केले. यावेळी व्यासपीठावर साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, संमेलनाचे निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर, दादा गोरे, समीर भुजबळ, विश्वास ठाकूर, मुकुंद कुलकर्णी, सुभाष पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
इन्फो
विद्रोही संमेलनालादेखील सर्व नियम लागू
विद्रोही साहित्य संमेलनालाचेही मार्चमध्येच आयोजन केले जाणार असले तरी कोरोनाबाबतचे शासनाचे नियम हे सर्व संमेलनांना आणि सर्वच ठिकाणी लागू राहणार आहेत. संमेलन कोणतेही असले तरी ते अधिकाधिक काळजी घेऊन पार पाडावे लागणार असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले.
इन्फो
मोठ्या मैदानावर मुख्य सोहळा
संमेलनासाठीचे आधीचे मुख्य मैदान लहान पडण्याची शक्यता लक्षात घेऊन गोएसो कॅम्पसमधील क्रिकेटच्या मोठ्या मैदानावरच मुख्य कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याचे लोकहितवादी मंडळाचे उपाध्यक्ष आणि संमेलनाचे कार्याध्यक्ष हेमंत टकले यांनी सांगितले. मैदानात १५ हजार खुर्च्यांची क्षमता असली तरी तिथे ७ हजार खुर्च्या ठेवून सुरक्षित अंतराबाबत दक्षता घेतली जाणार असल्याचेही टकले यांनी नमूद केले.
फोटो
२१भुजबळ संमेलन फोटो
साहित्य संमेलनाबाबतच्या पत्रकार परिषदप्रसंगी बोलताना स्वागताध्यक्ष छगन भुजबळ. समवेत समीर भुजबळ, कौतिकराव ठाले पाटील, हेमंत टकले, जयप्रकाश जातेगावकर, दादा गोरे, विश्वास ठाकूर, मुकुंद कुलकर्णी, सुभाष पाटील आदी.