नाशिक : रस्त्यांवर ठिकठिकाणी झालेले खड्ड्यांचे साम्राज्य, चिखलमय रस्ते, बंद पथदीप, तुंबलेल्या गटारी आणि कुजलेला कचरा ही समस्या आहे प्रभाग क्र मांक ६ मधील विविध परिसराचे. यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून, प्रभागाचे लोकप्रतिनिधी आणि महापालिका प्रशासन यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने समस्यांमध्ये दिवसागणिक वाढ होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. प्रभाग क्रमांक ६ मधील स्वामी विवेकानंदनगर, अश्वमेधनगर, कर्णानगर, पवार मळा, गजवक्रनगर आदि परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सदर परिसरातील बहुसंख्य अंतर्गत रस्त्यांचे अद्यापही डांबरीकरण वा कॉँक्रिटीकरण झालेले नाही. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांवर खड्डे तयार होतात. आहे त्या रस्त्यांवर मुरूम नसल्यामुळे खड्ड्यांची चाळण झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे आणि चिखल यामुळे रस्त्यावरून मार्गक्रमण करताना नागरिकांना कसरत करावी लागत आहे. डांबरीकरण वा कॉँक्रिटीकरण होईल तेव्हा होईल; मात्र सद्यस्थितीत पालिकेने अशा रस्त्यांवर मुरूम तरी टाकायला हवा, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत. परिसरातील अनेक रस्त्यांवर केवळ विजेचे खांब उभे करण्यात आले आहेत; मात्र त्यांना दिवे न बसविल्याने परिसरात रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य असते. आहे तेथील पथदीपही नेहमीच बंद असल्याचे नागरिकांनी सांगितले. नियमित साफसफाई होत नसल्याने परिसरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. पावसामुळे कचरा कुजला असून, दुर्गंधी सुटल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गटारींचे चेंबरही तुंबल्याने रस्त्यांवर दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रभागाच्या लोकप्रतिनिधींनी काही ठरावीक परिसराचाच विकास केला असून, काही भागाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. (प्रतिनिधी)