नाशिक : शहराच्या पाणीपुरवठ्याला मनसेच्या राजकारणाचा रंग चढला आहे. गेल्या आठवड्यात मनसेचे शहराध्यक्ष तथा स्थायी समितीचे सभापती राहुल ढिकले यांनी शनिवारपासून पाणीकपात रद्द झाल्याची घोषणा केली होती. तथापि, मनसेच्या महापौरांनी अद्याप निर्णय झाला नाही, असे सांगितले होते. आज त्यांनी पाणीपुरवठ्याबाबत प्रतिघोषणा करीत, मंगळवारपासून संपूर्ण शहरातील पाणीकपात रद्द करण्यात येईल; मात्र शहरात एकवेळच पाणीपुरवठा केला जाईल, अशी माहिती दिली.गेल्या शुक्रवारी स्थायी समिती सभापती राहुल ढिकले आणि गटनेता अशोक सातभाई यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांनी आयुक्त डॉ. संजीवकुमार यांची भेट घेतली आणि पाणीकपात रद्द करण्याची मागणी केली. ती मान्य झाल्याचे सांगून सभापती राहुल ढिकले यांनी शनिवारपासून पाणीकपात रद्द झाल्याची घोषणा केली होती. परंतु महापौर अॅड. यतिन वाघ यांनी पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता रमेश पवार यांच्याशी चर्चा करून निर्णय घेऊ, असे सांगितले होते. त्यानंतर अखेरीस सोमवारी महापौर वाघ यांनी पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता रमेश पवार यांच्याशी चर्चा केल्यानंतर तेथेच पत्रकार परिषद घेतली. मंगळवारपासून (दि. ५) पासून पाणीकपात रद्द करण्याची घोषणा करण्यात येईल, मात्र संपूर्ण शहरात एकवेळच पाणीपुरवठा केला जाणार असल्याचे सांगितले. सभापतींनी यापूर्वीच पाणीकपात रद्द केल्याची घोषणा केली असली तरी त्यांनी (सभापतींनी) निर्णय घेतला, आता मंगळवारपासून अंमलबजावणी होईल, असे महापौर अॅड. यतिन वाघ यांनी सांगितले. विशेष म्हणजे शुक्रवारी सभापतींसमवेत असलेले मनसे गटनेता अशोक सातभाई यांनी त्यास दुजोरा दिला.गंगापूर धरणात पुरेसा साठा नसल्याने पाऊस पडेपर्यंत पाण्याची बचत व्हावी, यासाठी महापालिकेने गेल्या ७ जुलैपासून शहरात सुमारे १५ टक्के पाणीकपात लागू केली होती. शहरातील सिडको आणि सातपूर या भागात एकवेळ पाणीपुरवठा होतो. त्यामुळे या विभागाला वगळून पूर्व आणि पश्चिम नाशिक, पंचवटी आणि नाशिकरोड या विभागात ७ जुलैपासून दोनवेळ ऐवजी एकवेळ पाणीपुरवठा करण्यात आला होता. आता मंगळवारपासून (दि.५) या सर्वच भागात एकवेळ पाणीपुरवठा कायम राहणार असला तरी त्यात वाढ केली जाणार असून, सुमारे ४५ मिनिटे ते दीड तास इतका कालावधी पाणीपुरवठ्यासाठी वाढवून दिला जाईल. (प्रतिनिधी)