इंदिरानगर : वडाळागाव येथे विद्युत मोटारीने पाणी खेचण्याची स्पर्धा सुरू असल्याने अण्णा भाऊ साठेनगरात ऐन उन्हाळ्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. परंतु अद्यापही पाणीपुरवठा विभागाच्या वतीने विद्युत मोटारी जप्तीची आणि दंडात्मक कारवाईची मोहीम राबविण्यात येत नसल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.वडाळागावात झीनतनगर, मेहबूबनगर, आलिशान सोसायटी, रहेमतनगर, गणेशनगर, जय मल्हार कॉलनी, सावित्रीबाई झोपडपट्टीसह परिसरात काही नागरिक मुख्य जलवाहिनीला विद्युत मोटारी लावून पाणी खेचत असल्याने परिसरात कृत्रिम पाणीटंचाई समोर जावे लागत असल्याची तक्रार त्रस्त नागरिकांनी केली आहे. गतवर्षी गंगापूर धरणात अत्यंत कमी जलसाठा असतानाही पाणीपुरवठा सुरळीत होता. यंदा धरणात मुबलक जलसाठा असतानाही पाणीपुरवठा विभागाच्या वितरण आणि यांत्रिक विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे.अण्णा भाऊ साठेनगरमध्ये सुमारे सातशे नागरिकांची वस्ती आहे. बहुतेक लोक मोलमजुरी करून उदरनिर्वाह करीत आहेत. परंतु महेबूबनगरसह परिसरातील काही नागरिकांनी जलवाहिनीस सर्रासपणे विद्युत मोटारी लावून पाणी खेचण्याचा प्रकार सुरू केला आहे. त्यामुळे अण्णा भाऊ साठेनगरसह परिसरात नळाला अत्यंत कमी दाबाने पाणी येत आहे. पिण्यापुरतेही पाणी भरले जात नाही. त्यामुळे एक दिवसाची मजुरी सोडून पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. त्रस्त नागरिकांची दखल घेत नगरसेवक डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू केला आहे. तसेच तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना दिल्या आहेत .
अण्णा भाऊ साठेनगरला टँकरद्वारे पाणीपुरवठा
By admin | Updated: April 4, 2017 02:13 IST