येवला : प्रत्येकाने आपल्या घर परिसरातील पाणी जमिनीत जिरविल्यास १२ महिने पाण्याचा तुटवडा भासणार नाही, या वस्तुस्थितीचे प्रत्यक्ष कृतीतून दर्शन घडविण्याचा प्रयत्न येवल्यातील ग्रामीण रुग्णालयात झाला आहे. पाऊस पडतो; पण पाणी अडवतं कोण? आणि जिरवण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे तीव्र पाणीटंचाई भासते.नैसर्गिक स्वरूपात उपलब्ध होणाऱ्या या पावसाचे पाणी जमिनीत जिरवून भूजल पातळीत वाढ करण्याची आवश्यकता नेहमीच व्यक्त होते; मात्र प्रत्यक्षात ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’चा प्रकल्प राबविण्याकडे दुर्लक्ष होत आले आहे. वर्षभर पाणी राहील, अशा पद्धतीने ग्रामीण रुग्णालयाच्या छतावरील पाणी एकत्रित केले आणि प्रकल्प साकारला अवघ्या चार दिवसात. येवल्यातील अद्ययावत अशा ३० खाटांच्या रुग्णालयात पाणीच नाही, अशा तक्रारी होत आहेत. पाण्याचा तुटवडा भासू नये म्हणून पाणी अडवाचा प्रस्ताव पुढे आला. रुग्णालयाच्या छतावर पावसाळ्यात पडणारे पाणी पाइपलाइनच्या माध्यमातून एकत्रित करून ते रुग्णालयाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या बोअरवेल शेजारीच आणून जिरवण्याची योजना तयार झाली. डॉ. किशोर पहिलवान यांची प्रेरणा आणि स्वखर्च करण्याची तयारी या पार्श्वभूमीवर, रुग्णालयातील कर्मचारी हिरामण गांगुर्डे, अशोक कांबळे, रूपेश पगारे, संगीता वानखेडे, मच्छिंद्र खैरनार, बाबासाहेब भड, जालिंदर निकम, सौ. साबळे, घनश्याम उंबरे यांच्यासह नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणारे डॉ. एस. डी. सदावर्ते, डॉ. नितीन जाधव, डॉ. जितेंद्र पवार, डॉ. योगिता माळोदे, डॉ. शरद चव्हाण, डॉ.प्रवीण मेश्राम यांनीदेखील याकामी श्रमदान करून पाच बाय पाच बाय पाच आकाराचा खड्डा घेतला. पाइपच्या साहाय्याने छतावरचे सारे पाणी एकत्रित करण्याची व्यवस्था केली. खड्ड्यात खाली जाड रेती, विटाचे तुकडे भरले आणि मध्यभागी एक रांजण ठेवून त्यात पाण्याचा पाइप सोडला. प्रकल्प सिद्धीस गेला. आता वाट पावसाची आहे. यंदाच्या पावसाने मुळातच असलेली बोअरवेल पुनर्जीवित होणार आहे आणि ग्रामीण रुग्णालयाची कायमची पाणीटंचाई श्रमदानातून सिद्धीस जाणार आहे.
ग्रामीण रु ग्णालयात वर्षभर पाणी
By admin | Updated: June 12, 2016 00:28 IST