नाशिक : नागरी व लष्करी अशी दुहेरी वस्ती असलेल्या देवळाली कॅन्टोंमेंट बोर्डापुढे पिण्याच्या पाण्याचे संकट उभे ठाकले असून, बोर्डाच्या हद्दीत एक-दोन दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक असल्याने किमान दहा टीएमसी इतके पाणी मिळण्याची मागणी बोर्ड प्रशासनाने केली आहे; परंतु बोर्डाकडे पाणी साठवण क्षमता नसल्याने धरणातून पाणी सोडणे शक्य आहे काय, याबाबत जिल्हा प्रशासनाने पाटबंधारे खात्याकडून अभिप्राय मागविला आहे. गुरुवारी यासंदर्भात कॅन्टोंमेंट बोर्डाकडून पाण्याची मागणी नोंदविण्यात आली. पावसाळा अजून लांब असून, आत्तापासूनच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे. शहराला दोन दिवस पुरेल एवढाच साठा शिल्लक असल्याने त्यावरच लष्करी हद्दीचाही पाण्याचा प्रश्न अवलंबून आहे. येत्या दोन दिवसांत पाणी न मिळाल्यास भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने ३१ जुलैअखेर सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी दहा टीएमसी पाणी मिळावे, अशी मागणी करण्यात आली आहे. त्यावर दारणा धरण समूहातून अशा प्रकारे पाणी देता येते काय याची चाचपणी सुरू झाली आहे. देवळाली कॅन्टोंमेंट बोर्डाकडे पाणी साठवणुकीची स्वत:ची क्षमता नसल्याने धरणातून पाणी सोडल्यास वाटेतच ते वाया जाण्याची शक्यता असल्याने असा पाणीपुरवठा करता येणे शक्य आहे किंवा नाही याबाबत पाटबंधारे खात्याचा अभिप्राय मागविण्यात आला आहे; त्यानंतरच पाणी सोडण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते यांनी दिली. याच प्रश्नावर खासदार हेमंत गोडसे यांनी जिल्हाधिकारी विलास पाटील यांची भेट घेऊन कॅन्टोंमेंट बोर्डासाठी पाण्याची मागणी केली.
देवळाली कॅन्टोंमेंटला पाण्याचे संकट
By admin | Updated: May 23, 2014 01:12 IST