चांदवड : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या योजनेद्वारे चांदवड शहराला दररोज जलशुध्दीकरण केंद्रातून पाणी वाटप केले जात आहे. शहरातील चंद्रेश्वरगडाच्या पायथ्याशी असलेला जलकुंभ शुक्रवारी रात्री पूर्ण क्षमतेने भरला होता. या कुंभातूनगावाला पाणी वाटप करण्यासाठी नगर परिषदेचे कर्मचारी गेले होते. मात्र व्हॉल्व्ह नादुरुस्त झाल्याने शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास सुमारे दोन लाख लिटर पाणी वाहून गेल्याने चांदवडकरांना दुष्काळात तेरावा महिना अशी प्रचिती आली.शुक्रवारी रात्री या जलकुंभात सुमारे अडीच लाख लिटर पाणी भरले गेले. शहरातील नळाने पाणी देण्याचा विचार नगर परिषदेचे कर्मचारी करीत असतानाच मुख्य वितरणाचा व्हॉल्व्ह सुरू होत नव्हता. म्हणून टॅँकरने गावात पाणी वितरण करावे असे ठरले. मनमाड येथील नगर परिषदेचे दुरुस्ती पथक व्हॉल्व्ह दुरुस्तीचे काम करीत होते. मात्र दुपारी ३ वाजेच्या सुमारास या मुख्य व्हॉल्व्हचा जॅक तुटल्याने जलकुंभातील लाखो लिटर पाणी रस्त्याने वाहून गेले. त्यावेळी काही नळांना व भागाला काही प्रमाणात पाणी मिळाले. पाणीटंचाई भेडसावत असताना सुमारे दोन लाख लिटर पाणी वाहून गेल्याने चांदवडकरांना दुष्काळात तेराव्याची प्रचिती आली. या घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष भूषण कासलीवाल, मुख्याधिकारी दिलीप मेनकर, नगरसेवक जगन्नाथ राऊत, संदीप उगले, गणेश खैरनार, वरचे राजवाड्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी व्हॉल्व्ह दुरुस्तीचे काम हाती घेतले असून, चांदवड शहराला पुन्हा एक-दोन दिवस पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल, अशी चर्चा आहे. (वार्ताहर)
दोन लाख लिटर पाणी वाया!
By admin | Updated: May 8, 2016 01:05 IST