सिन्नर : तालुक्यातील पास्ते परिसरातील वीजपुरवठा सातत्याने विस्कळीत होत असल्याने ग्रामस्थ, शेतकरी हैराण झाले आहेत. वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.वीजपुरवठ्याअभावी पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. शेत शिवारातील विहिरींना थ्रीफेज वीजपुरवठा होत नसल्याने माणसांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. वीजपुरवठा सुरळीत करावा यासाठी ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन अनेकदा निवेदने देण्यात आली. मात्र कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी चालढकल केली जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या वतीने घेण्यात आला आहे. या भागातील बहुतांश शेतकरी व ग्रामस्थांनी कृषिपंपांची तसेच घरगुती वीजजोडण्याची बिले भरली असतानाही वीज कंपनीच्या अकार्यक्षमतेमुळे वीजपुरवठा सुरळीत होत नसल्याने या परिसरात असंतोष पसरला आहे. या परिसरात सोमवार, मंगळवार व बुधवारी सकाळी साडेआठ ते दुपारी चाडेचार त्यानंतर गुरुवार ते रविवार रात्री साडेअकरा ते सकाळी साडेसात अशी भारनियमनाची वेळ आहे. परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून भारनियमनाव्यतिरिक्तही वीजपुरवठा खंडित केला जात आहे. तसेच असे भारनियमन सुरू आहे. येत्या सात दिवसांत वीजपुरवठा सुरळीत न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीने वीज कंपनीच्या कार्यालयावर मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला असून, त्यावर भाजयुमोचे माजी तालुकाध्यक्ष नेताजी काकड, वसंत आव्हाड, एल. एम. आव्हाड आदिंसह ग्रामस्थांची नावे आहेत. (वार्ताहर)
विस्कळीत वीजपुरवठ्याने पास्ते येथील ग्रामस्थ हैराण
By admin | Updated: July 30, 2014 00:20 IST