सिन्नर : ऑनलाइन अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ तत्काळ मिळावा, मागेल त्याला शेततळे योजना पुन्हा सुरू करावी, अशी मागणी उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली.
वडगाव-सिन्नर येथे राज्यस्तरीय कृषी संजीवनी योजनेचा शुभारंभ भुसे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी उगले यांनी शेतक-यांच्या विविध समस्यांबाबत निवेदन दिले. शासनाने शेतकऱ्यांच्या बाबतीत अटी व शर्तींच्या अधीन राहून जी ऑनलाइन पद्धत सुरू केली आहे, ती खरोखरच चांगली व पारदर्शक आहे. परंतु, स्थानिक पातळीवर अर्ज करूनही शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळत नाही. शेततळ्यांचे अस्तरीकरण, ट्रॅक्टर, अवजारे आदींचे एक हजार अर्ज असतात व लाभार्थी निवड शंभर ते दीडशे इतकीच होते. म्हणून, उर्वरित शेतक-यांना शासनाच्या योजनांपासून वंचित राहावे लागते. तसेच दोन्ही योजनांचा लक्षांक कमी असल्याने तो वाढवून मिळावा, असे उगले यांनी निवेदनात म्हटले आहे. यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी आव्हाड, तालुका कृषी अधिकारी अण्णासाहेब गागरे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.