नाशिक : विधानसभा निवडणुकीत शिवसंग्राम पक्षासाठी महायुतीकडे आपण राज्यात २०० जागांची मागणी केली, ही अफ वा असल्याचे आमदार विनायक मेटे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले़ नाशिक जिल्ह्यातील १५ जागांपैकी शिवसंग्राम पक्षाला दोन जागा मिळाव्यात, अशी मागणी महायुतीच्या पक्ष प्रमुखांकडे केली असल्याची माहिती मेटे यांनी दिली.मेटे म्हणाले, राज्यामध्ये असलेले कॉँग्रेस व राष्ट्रवादी आघाडी शासन हे भ्रष्टाचारी शासन आहे़ हे शासन उलथवून टाकणे हे आमचे मुख्य ध्येय असल्याने कोणाला किती जागा मिळतात हे महत्त्वाचे नाही;तर कोणत्या ठिकाणी कोणाचे उमेदवार निवडूनयेतील त्यावर महायुतीचे वाटप ठरणार आहे़ प्रत्येक पक्षाच्या ताकदीप्रमाणे सन्मानजनक पद्धतीने जागांचे वाटप होईल़ संपूर्ण देशात मराठा आरक्षण लागू करणे, शेतकऱ्यांना पेन्शन, ६० वर्षांवरील वृद्धांना मोफत औषधोपचार मिळावेत हे शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विषय असून, महायुतीच्या अजेंड्यामध्ये त्यांचा समावेश असेल़ आपण जसे राष्ट्रवादीमधून बाहेर पडलो तसेच अनेक कार्यकर्ते बाहेर पडणार असून, महायुतीने त्यांना सांभाळून घ्यावे, अशी विनंती केली़ धनगर व आदिवासी समाजाच्या आरक्षण आंदोलनाबाबत बोलताना ते म्हणाले, या दोन्ही समाजाला आरक्षणासाठी आंदोलन करण्यासाठी शासनानेच फू स दिली आहे़ परंतु ही दोन्ही आंदोलने शासनाच्या हाताबाहेर गेली असून, ते अधिक हिंसक होत असल्याने याची किंमत शासनाला मोजावी लागणार आहे़ (प्रतिनिधी)
शिवसंग्रामला हव्या दोन जागा
By admin | Updated: August 10, 2014 02:01 IST