पाथरे : सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे वीजवाहिनीमध्ये घर्षण होऊन पडलेल्या ठिणगीमुळे दोन एकर ऊस जळून खाक झाला. शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास सदर घटना घडली.पाथरे खुर्द शिवारातील गट नंबर ३१४ मध्ये जयश्री रवींद्र चोपडे यांच्या मालकीच्या दोन एकर शेतात उसाचे पीक आहे. याच शेतातून वीजवाहक तारा गेल्या आहेत. खांब वाकलेले असून, विजेच्या ताराही लोंबकळलेल्या आहेत. लोंबकळलेल्या तारांचे वाऱ्यामुळे घर्षण होऊन उडालेल्या ठिणग्या उसावर पडल्याने चिपाडाने पेट घेतल्याचे चोपडे यांनी सांगितले. वाऱ्यामुळे उसाचे पीक भराभरा पेटत असल्याचे पाहून परिसरातील शेतकरी नानासाहेब गुंजाळ, संगीता गुंजाळ, मोहन चिने यांनी घटनास्थळी धाव घेत चोपडे यांनाही भ्रमणध्वनीहून आगीची माहिती दिली. पूर्ण वाढलेल्या उसाने पेट घेतल्याने आगीच्या ज्वाळांनी आग विझविण्यास अपयश आले आणि काही वेळातच शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर सुमारे शंभर टन ऊस जळून खाक झाला.चोपडे यांच्याकडे बारा गायी आहेत. दुष्काळामुळे निर्माण झालेल्या चाराटंचाईचा सामना करण्यासाठी चोपडे यांनी ऊस कारखान्याला न देता जनावरांना चारा म्हणून ठेवला होता. याशिवाय परिसरातील काही शेतकऱ्यांनाही याच शेतातून ते चारा देत होते. आगीमुळे चोपडे यांचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.याशिवाय दूध व्यवसायावरही चाराटंचाईचा विपरीत परिणाम होणार आहे. तलाठी के. एम. परदेशी व वीज वितरण कंपनीचे शाखा अभियंता एल. एल. मांडगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. परिसरातील अनेक शेतांमध्ये वाकलेले विजेचे खांब व लोंबकळलेल्या तारांच्या समस्या आहेत. वीज वितरण कंपनीने त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)
पाथरे येथे दोन एकर ऊस खाक
By admin | Updated: May 8, 2016 00:19 IST