वडाळागाव : परिसरात मागील काही दिवसांपासून महापालिकेच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून कचरा जाळला जात असल्याने प्रदूषणात वाढ होत आहे. वडाळागाव परिसरातील प्रभाग क्रमांक ५४ व ३८ मध्ये कचऱ्याच्या उकिरडे स्वच्छ करण्यासाठी कर्मचाऱ्यांकडून कचरा जाळला जात आहे. यामुळे परिसरात सकाळच्या सुमारास धूर पसरत असून, नागरिकांना ठसका व दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. याबरोबरच हवेच्या प्रदूषणामध्येही वाढ होत आहे. रविशंकर रस्त्यावरील मांगीरबाबा चौकालगत असलेल्या उकिरड्यावरील कचराही पेटविला जात असल्याने धुराचे लोट पसरतात. यावेळी अरुंद चौकातून वाहनचालकांना मार्गस्थ होताना गैरसोय होते. धुरामुळे समोरीला वाहनांचा अंदाज येत नसल्याने अपघातांना निमंत्रण मिळत असल्याची तक्रार युवा सेनेचे पदाधिकारी रमीज पठाण यांनी आरोग्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. कचरा जाळण्यापासून कर्मचाऱ्यांना परावृत्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. (वार्ताहर)
कचऱ्याचा जाळ; प्रदूषणात वाढ
By admin | Updated: September 4, 2016 01:02 IST