लोकमत न्यूज नेटवर्कइगतपुरी : कसारा घाटातील मुंबईहून नाशिकला येणाऱ्या जुन्या घाटात जोरदार पावसामुळे आज पहाटेच्या सुमारास जव्हार फाट्याजवळ दरड कोसळल्यामुळे मुंबईहून नाशिकला जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या घटनेची माहिती मिळताच गॅमन इंडियाचे कर्मचारी व महामार्ग सुरक्षा पोलिसांनी धाव घेत महामार्गावरील कोसळलेल्या दरडी हटविण्याचे काम युद्धपातळीवर केले. अखेर तीन-चार तासांनंतर हटविण्यात यश आले; मात्र काही काळ याच महामार्गावरून एकेरी वाहतूक धिम्या गतीने चालू असल्याने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या; मात्र मार्ग काढत हळूहळू वाहतूक सुरळीत केली. या वेळी घटनास्थळी गॅमन इंडिया टोल प्लाझाचे कर्मचारी उमेर शेख, रवि देहाडे, विजय कुंडगर, सचिन भडांगे, संदीप म्हसणे, शेखर गायकवाड, वसीम शेख, राजू मोरे, रवि दुर्गुडे, समीर चौधरी आदींसह घोटी टॅब पोलीस कर्मचारी यांनी तत्काळ धाव घेऊन जुन्या कसारा घाटातील रस्ता रहदारीसाठी मोकळा केला.
कसारा घाटात दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प
By admin | Updated: July 17, 2017 00:57 IST