त्र्यंबकेश्वर : येत्या श्रावणी सोमवारी (दि. ११) त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची मोठी गर्दी होणार असून, साधारणत: चार ते पाच लाख भाविक येतील, असा अंदाज प्रशासनातर्फे व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था याबरोबरच स्वच्छता व साफसफाईप्रश्नी प्रशासनाची जोरदार तयारी पूर्णत्वाला आली आहे.तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठकीचे आयोजन नगराध्यक्ष यशोदा अडसरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते.या बैठकीत पाणीपुरवठा, आरोग्य विभाग, रुग्णालय व्यवस्था, पोलीस बंदोबस्त, साफसफाई यावर भर देण्यात आला. नियंत्रण कक्ष, आपत्ती व्यवस्थापन बॅरिकेड्स, परिक्रमा मार्ग आदि बाबींचीही चर्चा करण्यात आली.शनिवारी दुपारनंतर जव्हार फाटा येथे बसस्थानक स्थलांतरित केले जाणार आहे. तत्पूर्वी विभाग नियंत्रकांना पत्र देऊन रस्ता, पाण्याची सोय, स्वच्छतागृह तसेच बसस्थानक दुरुस्ती आदिंबाबत तातडीने सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सूचना देण्यात आल्या.यावेळी डॉक्टर भागवत लोंढे, किरण धनाईत, मंगेश प्रजापती आदिंनी या बैठकीत उपस्थित नगरसेवकांनी चर्चेत भाग घेतला. बैठकीस नगराध्यक्षांव्यतिरिक्त उपनगराध्यक्ष ललित लोहगावकर, संतोष कदम, धनंजय तुंगार, योगेश तुंगार, अनघा फडके, माधुरी जोशी, अलका शिरसाट, विजया लढ्ढा, आशा झोंबाड, शकुंतला वाटाणे, सिंधू दमधे, रवींद्र गमे, विरोधी पक्षनेते रवींद्र सोनवणे आदिंसह मुख्याधिकारी निवृत्ती नागरे, संजय मिसर, दीपक बंगाळ, प्रमोद कुलकर्णी आदि उपस्थित होते. (वार्ताहर)