नाशिक: शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये गुणात्मक बदल घडवून त्यांना चांगला माणूस बनविणे व सुसंस्कारित समाज घडविणे हे शिक्षकांचे प्रथम कर्तव्य आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी केले.जिल्हा परिषदेच्या सर्वशिक्षा अभियानाच्या वतीने २ ते ६ जूनच्या कालावधीत डी. डी. बिटको बॉईज हायस्कूल येथे सुधारित अभ्यासक्रमाबाबत इयत्ता चौथीच्या शिक्षकांसाठी जिल्हास्तरीय प्रशिक्षण सुरू असून, या प्रशिक्षणास भेट दिल्यानंतर बनकर बोलत होते. ते म्हणाले, जन्म ते मृत्यू या कालावधीत प्रत्येकावर तीन संस्कार पीठामार्फत केले जातात. त्यात घर/कुटुंब, शाळा व शालेय घटक आणि समाज व परिसर या तीन घटकांचा समावेश असतो. आजच्या स्पर्धात्मक व धकाधकीच्या जीवनात घर व कुटुंब यांना विद्यार्थ्यांकडे लक्ष देण्यास पुरेसा वेळ मिळत नाही. समाजातून संस्कार होतील अशी आदर्श स्थिती आज राहिलेली नाही. त्यामुळे साहजिकच शाळा व शालेय घटकांची विद्यार्थ्यांवर संस्कार घडविण्याची जबाबदारी वाढते. शिक्षक हा समाजाचा आधारस्तंभ आहे. असेही बनकर म्हणाले. या प्रशिक्षणास प्राथमिक शिक्षणाधिकारी रहीम मोेगल, सुनील दराडे, अनिल गिते आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)