नाशिक : दहावीनंतर कोणते शिक्षण घेतल्यास विद्यार्थी यशस्वी होईल, हे शोधणारे यंत्र अद्याप आले नसून कोणीही विद्यार्थ्याच्या यशाची ग्वाही देऊ शकत नाही. त्यामुळे कोणते क्षेत्र निवडावे हे पालकांनी व विद्यार्थ्याने स्वत: ठरविण्याची गरज असल्याचे प्रतिपादन तंत्रशिक्षण संचालनालयाच्या नाशिक विभागाचे संचालक डी. पी. नाठे यांनी केले. तंत्रशिक्षण संचालनालयाचे नाशिक विभागीय कार्यालय व नाशिक येथील के. के. वाघ शिक्षण संस्थेच्या तंत्रनिकेतन महाविद्यालयातर्फे येथील महाकवी कालिदास कलामंदिर येथे ‘तंत्रनिकेतन प्रवेशप्रक्रिया’ विषयावर मार्गदर्शन करताना नाठे बोलत होते. ते म्हणाले, ज्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी रेटा देऊन प्रवृत्त करावे लागते त्यांना तंत्रनिकेतन शाखेत पाठवणे योग्य असून, स्वत:हून अभ्यासात रुची दाखवणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांची इच्छा असल्यास अकरावी, बारावीसाठी प्रवेश घेण्यास पालकांनी पाठिंबा द्यायला हवा, असे मत नाठे यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)
अभियांत्रिकी प्रवेशाचा निर्णय विद्यार्थी, पालकांनी एकत्रित घ्यावा
By admin | Updated: June 10, 2016 23:47 IST