सटाणा : जिल्हा प्रशासनाने टॅँकरच्या प्रस्तावालाच अक्षरश: केराची टोपली दाखविल्याने अजमीर सौंदाणे येथे गुरुवारी दुपारी संतप्त महिला व पुरुषांनी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामसेवकाला कार्यालयात डांबून गावाच्या प्रवेशद्वाराजवळ तीन तास ठिय्या आंदोलन केले. जोपर्यंत टॅँकर येत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, अशी आक्रमक भूमिका गावकऱ्यांनी घेतल्याने प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले.ग्रामपंचायत प्रशासनाने दोन महिन्यांपूर्वी टॅँकरने पाणीपुरवठा करावा, असा प्रस्ताव तहसीलदार व गटविकास अधिकाऱ्यांकडे पाठवला होता. दहा दिवस उलटूनही जिल्हा प्रशासनाने आश्वासनाची पूर्ती करण्याऐवजी टॅँकरच्या प्रस्तावालाच केराची टोपली दाखविल्याचे उघडकीस आल्याने अजमीर सौंदाणे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट उसळली. सकाळी साडेदहा वाजता संतप्त महिला व पुरुषांनी हंडा मोर्चा काढून सरपंच रेणाबाई सोनवणे, उपसरपंच सुनील महाजन, सदस्य मंगेश पवार, ग्रामसेवक बी.एन.ठोके यांना ग्रामपंचायत कार्यलयात डांबून ठेवत तीन तास ठिय्या दिला. (वार्ताहर)
पाण्यासाठी महिलांचा ठिय्या
By admin | Updated: March 30, 2017 23:37 IST