नाशिक : जय बाबाजी.. जय महात्माजी... च्या जयघोषात आणि ओम जनार्दनाय नम: या मंत्रोच्चारात गोदाघाटावरील श्रद्धा लॉन्समध्ये वार्षिक यज्ञ अनुष्ठान सोहळ्यास उत्साहात प्रारंभ झाला. अनुष्ठानास नाशिक जिल्ह्यासह राज्यभरातून सुमारे ३०० ते ३५० अनुष्ठानार्थी बसले आहेत. राष्ट्रसंत जनार्दनस्वामी महाराज यांच्या आशीर्वादाने उत्तराधिकारी स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या प्रेरणेने वार्षिक यज्ञ अनुष्ठान सोहळा समितीच्या वतीने दि. ६ ते १३ दरम्यान वार्षिक यज्ञ अनुष्ठान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. प्रारंभी सकाळी ९ वाजता जनार्दनस्वामींच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत स्वामी शांतिगिरी महाराज यांच्यासह जय बाबाजी भक्त परिवार मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. गाडगे महाराज पुलापासून निघालेली पालखी मिरवणूक रामकुंड येथे आल्यावर पालखीचे पाद्यपूजन करण्यात आले. त्यांनतर सकाळी ११ वाजता अनुष्ठानस्थळी बाबाजींच्या विधी व आरतीने अनुष्ठानाला प्रारंभ झाला. आठवडाभर चालणाऱ्या या सोहळ्यात नित्यनेम सकाळी ६ ते ८ आणि सायंकाळी ७ ते १० वाजेदरम्यान आरती, प्रवचन होणार आहे. स्वामी शांतिगिरी महाराज यांंचा दररोज सत्संग होणार आहे. नित्यनेम पहाटे ५ वाजता, सकाळी १० वाजता व सायंकाळी ४ वाजता सामूहिक विधी पठण होणार आहे. अनुष्ठानस्थळी दररोज दोन हजार भाविकांना अन्नदान, तर शेवटच्या दिवशी सुमारे १५ हजार लोकांना अन्नदान केले जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. (प्रतिनिधी)
अनुष्ठान सोहळ्यास उत्साहात प्रारंभ
By admin | Updated: June 7, 2014 01:48 IST