सिन्नर : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तालुक्यातील पांढुर्ली येथील उपबाजार आवारात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर कांदा लिलावास प्रारंभ करण्यात आला. लिलावाच्या पहिल्या दिवशी अमोल वाजे या शेतकऱ्यास एक हजार ११ रूपये क्विंटलचा भाव मिळाला. शनिवार (दि. ६) रोजी पहिल्याच दिवशी परिसरातील शेतकऱ्यांनी उपबाजारात कांदा विक्रीसाठी आणला होता. बाजार समितीचे सचिव विजय विखे, उपसचिव पांडुरंग जाधव, रंगनाथ डगळे आदींसह उत्पादक शेतकरी व व्यापारी यांच्या उपस्थितीत लिलावास सुरूवात करण्यात आली. नंदू जाधव, आनंद ठक्कर, गणेश चौधरी, अमोल जाधव, बाळासाहेब बरकले, दत्तू वाजे, अंबादास भुजबळ, तुकाराम वाजे, अमोल वाजे आदी शेतकरी उपस्थित होते. शनिवारी १ हजार ६३० क्विंटल आवक झाली. सरासरी सातशे ते आठशे रूपयांपर्यंत बाजारभाव होता. यापुढे दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार या तीन दिवस लिलाव सुरू राहणार असून शेतकऱ्यांनी आपला कांदा प्रतवारी करून बाजारात आणावा असे आवाहन बाजार समितीच्या वतीने करण्यात आले.
पांढुर्ली उपबाजार आवारात कांदा लिलावास सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 15:19 IST