नाशिक : सदगुरू ओम गुरूदेव माउली तथा आत्मा मालिक ध्यानपीठ परिवाराच्या वतीने शनिवारी संध्याकाळी साधुग्राममधून भव्य दिंडी काढण्यात आली.तपोवनातून प्रारंभ करण्यात आलेली दिंडी गणेशवाडीमार्गे, नवीन शाहीमार्गाने गौरी पटांगणावरून रामकुंडावर पोहचली. ही मिरवणूक साधुग्राममधील आखाड्यातील साधू-महंतांनी जुन्या शाहीमार्गावर अडविल्यामुळे दुसऱ्या मार्गाने वळविण्यात आली होती. यावरून साधुग्राम परिसरात काही काळ तणावाचे वातावरण पसरले होते. आत्मा मालिक ध्यानपीठ परिवाराने आखाड्यांच्या महंतांचा निषेध म्हणून रामकुंडावर स्नान न करता केवळ आत्मध्यान करणे पसंत केले.आत्मा मालिक ध्यानपीठच्या वतीने यंदा प्रथमच कुंभमेळ्यानिमित्त साधुग्राममध्ये इंद्रायणी लॉन्स, तपोवनात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. आखाडे व खालशांच्या पहिल्या शाहीस्नानामध्ये आत्मा मालिक ध्यानपीठाचा सहभाग नव्हता. त्याऐवजी शनिवारी दुपारी ३ वाजता काढण्यात आलेल्या मिरवणुकीच्या प्रारंभी राज्याचे उद्योगमंत्री प्रकाश मेहता, पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार बाळासाहेब सानप आदि मान्यवरांनी आरती के ली. एकूण ३४ चित्ररथ, वाहने सहभागी झाली होती. यावेळी रथावर ओम गुरूदेव जंगलीदास महाराज, देवानंद महाराज, परमानंद महाराज आदिंसह २५० साधू-संत विराजमान होते. तसेच विदेशी भाविकांचे पथक देखील या मिरवणुकीत सहभागी झाले होते. स्केटिंग पथक, विद्यार्थ्यांचे ढोल पथक, लेझीम पथक, झांज पथक, बॅण्ड पथक आदिंचे दहा पथक होते. त्यापाठोपाठ छत्र, चामरे, भगवे झेंडे हातात घेऊन नृत्य करणारे भाविकांनी लक्ष वेधले. नऊवारी सारी परिधान करून फुगडी नृत्य करणाऱ्या महिला दिंडीचे आकर्षण ठरले. सदर मिरवणूक साधुग्राममध्ये अडविण्यात आल्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करून तत्काळ तणाव निवळण्याचा प्रयत्न केला. आणि सदर मिरवणूक वजा दिंडी औरंगाबाद रस्त्याने वळविण्यात आली. यामुळे भाविकांचा हिरमोड झाला होता. त्याचप्रमाणे मार्ग लांब पल्ल्याचा झाल्यामुळे दिंडीमध्ये सहभागी महिला, ज्येष्ठ भाविक, मुले यांची पायपीट झाली.
आत्मा मालिक ध्यानपीठाची मिरवणूक
By admin | Updated: September 5, 2015 23:00 IST