नाशिक : स्मार्ट सिटी योजनेत नगररचना योजना म्हणजेच टीपी स्कीमची तरतूद आहे. त्यामुळे शहरातील काही भागांचा नियोजनपूर्वक विकास होणे शक्य आहे, असे मत नगररचना विभागाचे उपसंचालक शिवराज पाटील यांंनी व्यक्त केले. नाशिक महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत विकासकांसाठी येथील महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. स्मार्ट सिटी अंतर्गत तीन पर्यायांपैकी एक म्हणजेच हरित क्षेत्रात टीपी स्कीमच्या माध्यमातून सुनियोजित टाऊनशिप उभारता येऊ शकते. त्यासंदर्भात या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. हरित क्षेत्रात अशा प्रकारची योजना राबविण्यासाठी पाचशे एकर क्षेत्र आवश्यक आहे. त्यात शहरातील विशिष्ट भाग निवडून विकास साधायचा असून, कोणत्या भागात अशा प्रकारची योजना राबविता येईल, यासंदर्भात महापालिकेनेच लोकांना आवाहन केले आहे. नगररचना योजना म्हणजेच टीपी स्कीमअंतर्गत काही जागा रस्ते आणि अन्य सुविधांसाठी वापरता येईल. परंतु त्याचमुळे जमिनीचे मूल्यही कमालीचे वाढणार असल्याचे पाटील यांनी सांगितले. नगररचना योजना राबविण्याचा इरादा महापालिकेने जाहीर केल्यानंतर शासन १८ महिन्यांच्या आत योजनेला मंजुरी देत असते. शासनाने मंजुरी दिल्यानंतर प्रारूपात दाखविलेले रस्ते आणि इतर सुविधांचे भूखंड महापालिकेकडे हस्तांतरित होतील. प्रारूप योजनेप्रमाणे रेखांकन अंतिम असेल आणि त्याप्रमाणे विकासकामे सुरू होतील. योजनेतील आर्थिक आणि इतर बाबी निश्चित करण्यासाठी लवाद नेमण्यात येतील. लवाद हे सर्व हितसंबंधिताना नोटीस बजावून त्यांचे म्हणणे ऐकून घेतील. तसेच जागेवर जाऊन मोजणी करून आखणी करतील. नियोजनबद्ध गृहनिर्माण योजना राबविण्यासाठी ही योजना उत्तम असून, जमीनधारकांनी त्यात सहभागी होण्यास हरकत नाही, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
स्मार्ट सिटीअंतर्गत टीपी स्कीम शक्य : पाटील
By admin | Updated: November 17, 2015 23:30 IST