सिन्नर : मराठा क्रांती मोर्चा हा कोणत्याही समाजाविरोधात नाही. समाजाचा असंतोष शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी या मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. या मोर्चाचे नेतृत्व मराठा समाज करीत असला तरी सर्वांनी सामुदायिक जबाबदारी समजून या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी केले. २४ सप्टेंबर रोजी नाशिक येथे मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या नियोजनासाठी येथील मातोश्री नर्मदा लॉन्स येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मोर्चाच्या नियोजनाची माहिती देताना कोकाटे बोलत होते. कु. दिव्या साळुंके या मुलीच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून नियोजन बैठकीस प्रारंभ करण्यात आला. मेळाव्याचे संपूर्ण नियोजन ठरले आहे. केवळ प्रत्येकाने उपस्थित राहून सहभाग नोंदविण्याची गरज असल्याचे कोकाटे म्हणाले. मोर्चासाठी लागणारे साहित्य गावोगाव पोहच होईल. कोणताही पक्षीय भेदभाव न करता किंवा राजकारण न आणता प्रत्येक आपले वाहन घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले. त्याचबरोबर अल्पसंख्याक समाजालाही या मोर्चात सहभागी करून घ्या, असे कोकाटे म्हणाले. सदर मोर्चा निषेधाचा असून, सर्वांनी उपस्थित राहून मोर्चा कसा असावा हे दाखवून देण्याची गरज असल्याचे अॅड. अनंत जगताप यांनी सांगितले. या मोर्चाला कोणीही नेता नाही. एकाही तरुणाने घरी थांबू नये. मोर्चात शिस्त पाळावी असे अॅड. जगताप यांनी सांगितले. सुमारे ३०० वर्षानंतर मराठा समाज इतक्या मोठ्या संख्येने एकत्र येत असून कोणत्याही जातीविरुध्द हा मोर्चा नसल्याचे अॅड. भगिरथ शिंदे यांनी सांगितले. यावेळी प्रा. राजाराम मुंगसे, छाया पाटील, मनसेचे तालुकाप्रमुख शरद शिंदे, अण्णासाहेब गडाख, गोविंद लोखंडे, छावा संघटनेचे विलास पांगारकर यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्त केले. (वार्ताहर)
जबाबदारी समजून सहभागी व्हा
By admin | Updated: September 11, 2016 00:50 IST