नाशिक : सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेली अकरावी प्रवेशप्रक्रिया पुन्हा सुरू झाली असून, दुसऱ्या फेरीसाठी शनिवारी (दि. ५) दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयापूर्वी एसइबीसी प्रवर्गातून अर्ज केलेल्या २१३ विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ मिळाला असून, उर्वरित ३८६ विद्यार्थ्यांना आता खुल्या प्रवगार्तून प्रवेश घ्यावा लागणार आहे. परंतु, प्रवेशप्रक्रियेनंतर न्यायालयातील स्थगिती उठल्यास आपल्या आरक्षणाचे काय होणार या विचाराने एसईबीसी प्रवर्गातून अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांची कोंडी झाली आहे.
नाशिक शहरात अकरावीच्या २५ हजार २७० जागा उपलब्ध असून पहिल्या फेरीत ८ हजार १८० जागा भरल्या आहेत. मराठा आरक्षणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याने अकरावीची प्रवेशप्रक्रिया रखडली होती. मात्र न्यायालयाने आरक्षणास स्थगिती दिल्यानंतर प्रवेशप्रक्रियेचे नवीन वेळापत्रक जाहीर झाले असून, शहरातील ६० कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीची ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया २६ नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. मात्र न्यायालयाच्या निर्देशांनुसार, एसइबीसी कोट्यातून प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या ३६८ घेणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थांना आता खुल्या प्रवर्गातून प्रवेश घ्यावा लागणार आहे. दरम्यान, शहरातील ६० कनिष्ठ महाविद्यालयांतील २० हजार ६१६ जागांसाठी पहिली गुणवत्ता जाहीर झाली. यात ८ हजार ४८५ विद्या र्थ्यांची निवड झालेली नाही. त्यांना पुढील गुणवत्ता यादीची प्रतीक्षा करावी लागेल. आतापर्यंत ३१ हजार ४० विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केला आहे. त्यापैकी २५ हजार ४७५ विद्यार्थ्यांचे अर्जांची तपासणी पूर्ण झाली आहे. तर २२ हजार २४९ विद्यार्थ्यांनी महाविद्यालयांचे पर्याय निवडले आहेत. आता दुसऱ्या फेरीत १७ हजार ९० जागांसाठी २३ हजार ३९२ विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज आहेत.
इन्फो-अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक
- ५ डिसेंबर : दुसऱ्या फेरीची अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे.
- ५ ते ९ डिसेंबर : विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश घेणे.
- १० डिसेंबर : तिसऱ्या प्रवेश फेरीसाठी रिक्त जागांचा अहवाल सादर करणे.