श्याम बागुल नाशिककोणी नुसतंच ‘आरे’ म्हटलं की ‘कारे’ने त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सरसावणारे हात. नखं, सुळे प्रतिस्पर्ध्याच्या नरडीचा घोट घेण्यासाठी कायमच आसुरलेले आणि नाही म्हटलं तरी, गेली पन्नास वर्षे जशास तसे उत्तर देण्याची, अंगावर आले की शिंगावर घेण्याची व नादाला लागाल तर वाट लावून टाकण्याची दमबाजी करण्याची परंपरा राखून असलेल्या वाघांनी कोणा एका गल्लीतील गुंडाच्या नुसत्याच वक्रदृष्टीने इतकं जायबंदी व्हावे हे आश्चर्य नव्हे काय? महापालिकेच्या पोटनिवडणुकीत म्हणजे आगामी निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून ज्याकडे पाहिले जाते, त्या मैदानात उतरण्यापूर्वीच प्रतिस्पर्ध्याने अस्मान दाखवावे आणि चारीमुंडी चितपट पडल्यानंतर त्याला भ्रष्टाचार व गुंडगिरीची जोड देऊन आपल्या अपयशाची कारणमीमांसा करावी याला वाघाची शेळी झाली, असे म्हणावे काय? केंद्र-राज्याच्या सत्तेत सहभागी झालेल्या सेनेकडे जिल्ह्यात एक मंत्रिपद तर आहेच, परंतु तीन आमदार, एक खासदार, महापालिका, जिल्हा परिषदेत सत्ताधारी पक्षाच्या खालोखाल सदस्य आहेत. राज्यात सत्तेवर आल्यावर त्यातही भाजपाकडून कायम दुय्यम वागणूक मिळत असल्याच्या तक्रारी असताना सेनेत इन्कमिंगचा ओघाने ताकदीत दुप्पट वाढ होऊनही निव्वळ महापालिकेच्या पोटनिवडणुकीत झालेला पराभव सेनेला इतके दुबळे करून गेला हेच मुळी सैनिकांच्या पचनी पडलेले नाही. कारण महापालिका निवडणुकीच्या तोंडावर होत असलेले पक्षप्रवेश सोहळे पाहता, ‘अब रामायण दूर नही’ असे मानून चालणाऱ्या पक्षाच्या मुखंडांना आकाश ठेंगणे तर झालेच पण त्यातून प्रथमपौरांचा अंगरखा आजच अंगावर चढल्याचा साक्षात्कारही होत गेला. त्यातूनच मग पक्षांतर्गत चढा-ओढीला चालना मिळून एकमेकांचे पत्ते काटण्याचे राजकारणही खेळले गेले. भरप्रवाहात असलेल्यांना थेट किनारा दाखविण्यात आला तर ज्यांनी यापूर्वी पदे भोगली, त्यांना पुन्हा धुमारे फुटले. या साऱ्याला जोड म्हणून मग ज्यांच्या बळावर निवडणुका जिंकायच्यात त्या सैनिकांमध्ये जान आणण्यासाठी मेळावे, बैठका, जनता दरबार भरविण्यात आले. हे करत असताना जेव्हा जेव्हा आणि जसा जसा वेळ मिळाला त्यातून मित्रपक्षाची खोडी काढण्याची एकही संधी हातून निसटून न देण्याचे राजकारणही खेळले गेले. जनमत वा भावना आपल्या बाजूनेच असल्याचे फसवे दावे ‘मातोश्री’ दरबारी करून आपल्या ताकदीचे (?) प्रदर्शनही करण्यात आले. त्यामुळे नाशिकरोडच्या पोटनिवडणुकीत उमेदवार जाहीर करण्यापूर्वीच जणू काही दोन्ही जागा खिशात पडल्या व होऊ घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत महापालिकेची सत्ता आपल्याच ताब्यात अशा आविर्भावात असलेल्यांचा चांगलाच हिरमोड झाला. या निवडणुकीत पराभव का झाला याचे आत्मपरीक्षण करण्याऐवजी मित्रपक्षाने विजय कसा व कोणाकडून पदरात पाडून घेतला यावरच भर देण्यात आला. भाजपाने सत्तेचा गैरवापर केला हा काढलेला निष्कर्ष पाहता, सत्तेतर आपणही सहभागी आहोत याचा सोयिस्कर विसर सेनेने स्वत:हून पाडून घेतला. त्यामुळे सत्ता राबविण्यात व चालविण्यात आपण अपयशी आहोत, याची खुली कबुली तर दिलीच, परंतु भाजप-सेनेच्या राज्यातही भ्रष्टाचार व गुंडगिरी संपुष्टात येऊ शकली नाही, यावर त्यांनीच शिक्कामोर्तब करून टाकले. येणाऱ्या निवडणुकीत आता भाजपा हाच फार्म्युला वापरणार हे जवळपास स्पष्ट झालेले असताना, सेनेलाही विजयश्री खेचून आणण्यासाठी एक तर भाजपाच्याच मार्गावर वाटचाल करावी लागेल, ते करायचे नसेल तर निवडणूक रिंगणातून माघार तरी घ्यावी लागेल. यापैकी दुसरा पर्याय गुढग्याला बाशिंग बांधून असलेल्या पक्ष पदाधिकाऱ्यांच्या पचनी पडणार नाही, त्यामुळे जो काही शेवटचा मार्ग शिल्लक राहतो, ते पाहता भाजपाला दोष देण्यात अर्थ तो काय?
स्वत:च्या दुबळेपणावर सेनेचे शिक्कामोर्तब
By admin | Updated: September 4, 2016 01:13 IST