नाशिक : गोवा येथील सत्गुरू फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘वंदे मातरम्’ सोहळ्यात विविध मान्यवरांना पद्नाभ संप्रदायाचे पीठाधीश्वर ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांनी युवकांना देशभक्तीपर संदेश देत देशासाठी समर्पित होण्याचे आवाहन केले.महाकवी कालिदास कलामंदिरात आयोजित ‘वंदे मातरम्’ या सोहळ्यात ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांच्या हस्ते नाशिकचे खासदार हेमंत गोडसे, निवृत्त ब्रिगेडियर अनिरुद्ध देव, नाशिकचे डॉ. दीपक सोनवणी, आंतरराष्ट्रीय धावपटू व सावरपाडा एक्स्प्रेस कविता राऊत, निवृत्त सैनिक विवेक पाटे, नौदल अधिकारी रामभाऊ म्हसे यांना मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी कविता राऊत हिने येत्या आॅलिम्पिकमध्ये देशासाठी पदक मिळविणे हेच ध्येय असल्याचे सांगितले. ब्रिगेडियर अनिरुद्ध देव यांनी तरुणांना देशसेवेसाठी लष्करात येण्याचा सल्ला दिला आणि देशाला लढवय्या युवकांची गरज असल्याचे सांगितले. डॉ. दीपक सोनवणी यांनी फिटनेसकडे करिअर म्हणून पाहण्याचे आवाहन केले. खासदार हेमंत गोडसे यांनी नाशिकच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले, तर विवेक पाटे यांनीही कृतज्ञतेचा भाव व्यक्त केला. यावेळी आमदार सीमा हिरे यांनीही मनोगत व्यक्त केले. दरम्यान, ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांनी युवकांना उद्देशून मार्गदर्शन करत देशसेवेसाठी झोकून देण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक सत्गुरू फाउंडेशनच्या अध्यक्ष अॅड. ब्राह्मीदेवी यांनी केले. पद्मनाभ पीठाधीश्वर संप्रदायाचे अध्यक्ष रामचंद्र नाईक यांनीही मनोगत व्यक्त करत संप्रदायाची माहिती दिली. यावेळी ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांचा सत्कार आयोजक परशुराम कानकेकर आणि सुनील साळगावकर यांच्या हस्ते करण्यात आला. व्यासपीठावर लक्ष्मण सावजी, धनंजय बेळे, नगरसेवक सतीश सोनवणे आदि उपस्थित होते. तत्पूर्वी, कालिका मंदिरापासून ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी यांची मिरवणूक काढण्यात आली. (प्रतिनिधी)
सत्गुरू फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2016 10:37 IST