नाशिक : जिल्ह्यात यावर्षी देवळा आणि मालेगाव तालुका वगळता सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने आॅगस्ट महिन्यातच पावसाच्या सरासरीने शंभरी पार केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १०१ टक्के पाऊस झाला असून धरणातील एकूण पाणीसाठा ८५ टक्क्यांवर पोहोचला आहे.यंदा जिल्ह्यात सर्वत्र चांगला पाऊस झाला असून धरणांची पातळीही समाधानकारक आहे. हंगामात सर्वाधिक पावसाची नोंद नाशिक तालुक्यात १६१ टक्के झाली आहे. त्या खालोखाल सुरगाणा ११९, इगतपुरी १०७, दिंडोरी आणि पेठ १०६, नांदगाव १०३, सिन्नर १००, त्र्यंबकेश्वर तालुक्यात ९८ टक्के पाऊस झाला आहे. कळवण, निफाड आणि येवला तालुक्यात ८० टक्क्यापेक्षा जास्त तर चांदवड आणि बागलाण तालुक्यात ७५ टक्क्यापेक्षा जास्त पाऊस झाला आहे. मालेगाव तालुक्यात ५७ तर देवळा तालुक्यात ५८ टक्के पावसाची नोंद झाली आहे.जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०१३ मिमी असून आतापर्यंत १०३३ मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. यंदाच्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात देखील समाधानकारक वाढ झाली असून एकूण पाणीसाठा ८५ टक्क्यांवर पोहोचला आहे. करंजवण, वाघाड, ओझरखेड, तिसगाव, भावली, वालदेवी, कडवा, भोजापूर, हरणबारी, केळझर या धरणांत उपयुक्त साठ्याने शंभरी ओलांडली आहे. तर दारणा, गंगापूर, काश्यपी, गौतमी गोदावरी, पुणेगाव प्रकल्प आणि नांदूरमधमेश्वर बंधाºयात ९५ टक्क्यापेक्षा जास्त पाणीसाठा आहे. पालखेड आणि पूनद धरण ८५ टक्क्यापेक्षा जास्त भरले आहे. गिरणा प्रकल्पात ६३, मुकणे प्रकल्पात ७८, माणिकपुंज प्रकल्पात ७३ तर नागासाक्या प्रकल्पात शून्य टक्के पाणीसाठा आहे.
जिल्ह्यात पावसाच्या सरासरीने गाठली शंभरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 00:50 IST