पंचवटी : सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रस्ता सुरक्षा समिती गठीत करण्यात आली असून या अनुषंगाने कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाईचे निर्देश प्रादेशिक परिवहन विभागाला देण्यात आले आहे. सर्वाेच्च न्यायालयाने रस्ता सुरक्षिततेसाठी समिती गठीत करून कारवाई करण्याबाबत आदेश दिल्याने वाहनधारकांना आता नियमांची पायमल्ली केल्यास कडक कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. वाहन निर्धारित वेगापेक्षा जास्त वेगाने चालविताना आढळून आल्यास कलम ११२, तसेच वाहन चालविताना मोबाइल फोनचा वापर करून वाहन चालविणे कलम (२५० ए), लाल सिग्नल तोडणे कलम (११९/१९०), भारक्षमतेपेक्षा जास्त माल वाहतूक तसेच प्रवासी वाहतूक करणे कलम (११३/१९४) आणि अंमली पदार्थांचे सेवन करून वाहन चालविणे कलम (१८५) या गुन्ह्यांसाठी मोटार वाहन कायद्या, १९८८, च्या कलम १९ व केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम २१ अंतर्गत दोषी विरुद्ध कमीत कमी ३ महिने कालावधीसाठी अनुज्ञप्ती (लायसन्स) निलंबन करण्यात येणार आहे. तसेच हेल्मेट, सीट बेल्ट संबंधीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कमीत कमी दोन तास समुपदेशन करण्यात येणार असून त्यानंतर त्यांच्यावर मोटार वाहन कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचे निर्देश समितीच्या पत्रात देण्यात आले आहेत. सदर रस्ता सुरक्षितता समितीच्या निर्देशानुसार कडक कारवाई करण्यात येणार असल्याने सर्व लायसन्सधारकांनी कारवाई टाळण्यासाठी नियमांचे पालन करावे व दंडात्मक लायसन्स निलंबनाची विभागीय कारवाई टाळावी असे पत्रकात म्हटले आहे. (वार्ताहर)
रस्ता सुरक्षा समिती गठीत
By admin | Updated: September 23, 2015 00:18 IST