लोकमत न्यूज नेटवर्कबेलगाव कुऱ्हे : वर्षानुवर्षे गावात रस्ते नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात सर्व गाव चिखलमय होते. यामुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. गटारींचे सांडपाणी गावभर पसरून साथीचे रोग वाढले आहेत. टाकेद खुर्द येथील रणरागिणींनी आक्रमक होत येथील गुडघाभर चिखल असणाऱ्या गावातील रस्त्यावरच भाताची लागवड करून आपला संताप व्यक्त केला. लोकप्रतिनिधींच्या नावाने निषेध करून टाकेद खुर्द गावात किमान मूलभूत सुविधा मिळणार आहेत का नाही, असा आर्त सवाल या महिलांनी उपस्थित केला आहे. दरवर्षी पावसाळ्यात चिखलात वाहणाऱ्या गटारीच्या पाण्यातून ग्रामस्थांना मार्गक्रमण करावे लागते. अस्वच्छतेमुळे गावकऱ्यांचे आरोग्य बिघडून साथीच्या रोगांशी सामना करावा लागत आहे. यास गावातील लोकप्रतिनिधींसह तालुक्यातील लोकप्रतिनिधींचे वाढते दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दरवर्षी हीच समस्या असल्याने गावातील महिलांनी आक्र मक भूमिका घेऊन गावातील रस्त्यावर भात लागवड (आवणी) करत संताप व्यक्त केला. सध्या पावसाळ्याचे दिवस असून, या गावात पक्का रस्ता नाही. जुन्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले असून, ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. वारंवार निवेदने देऊनही काही उपयोग होत नाही. शासन व लोकप्रतिनिध मुद्दाम मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करून महिलांनी रस्त्यात भात लावणी करून आपला संताप व्यक्त केला. या आंदोलनात गीता लगड, जनाबाई लगड, बहिरू लगड, मनोज जोशी, नामदेव लगड सहभागी झाले होते.
रस्त्यात भाताची लागवड
By admin | Updated: July 16, 2017 01:10 IST