विजय मोरे
नाशिकगरोदर महिलांची प्रसूतीपूर्व तपासणी, लोहयुक्त गोळ्यांचे वाटप, तीव्र रक्ताशय असलेल्या महिलांवर विशेष लक्ष, जननी सुरक्षा योजनेची प्रभावी अंमलबजावणी व वाहन सुविधा यामुळे प्रसूतीकाळातील महिलांच्या मृत्यूचे प्रमाण नाशिक विभागात घटले आहे. २०११-१२ मध्ये २१०, २०१२-१३ मध्ये १७२, तर २०१३-१४ मध्ये १७८ गरोदर महिलांचा मृत्यू झाल्याचे नाशिकच्या आरोग्य उपसंचालक विभागाने दिलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते़ प्रसूतीकाळातील महिलांच्या मृत्यूचे प्रमाण जरी कमी झाले असले, तरी उच्च रक्तदाब ही समस्या मात्र कायम आहे.नाशिक विभागातील जिल्ह्यांचा व ग्रामीण भागाचा विचार करता नाशिक जिल्ह्यात गरोदर माता मृत्यूची संख्या इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त असून, त्यामानाने धुळे जिल्ह्यात सर्वात कमी आहे़ २०१२-१३ मध्ये नाशिकमध्ये ५४, धुळे- ८, जळगाव- ५०, नंदुरबार- ३० व अहमदनगरमध्ये ३० गरोदर मातांचे मृत्यू झाले़ २०१३-१४ मध्ये नाशिक- ५४, धुळे- ९, जळगाव- ३२, नंदुरबार ४३, तर अहमदनगरमध्ये ४० गरोदर मातांचा मृत्यू झाला़ मात्र ही सर्व आकडेवारी पाहता २०११-१२ च्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण रोखण्यात आरोग्य विभागाला यश आल्याचे दिसून येते़आरोग्य विभागाच्या वतीने गरोदर महिलांच्या मृत्यूच्या कारणांची नोंद ठेवली जाते़ त्यामध्ये प्रसूतीपूर्व रक्तस्त्राव, प्रसूतीपश्चात जंतुदोष, रक्तक्षय आणि अन्य कारणांमुळे महिलांचे मृत्यू झाल्याची नोंद आहे़ त्यामध्ये गरोदरपणातील उच्च रक्तदाब हीदेखील एक महत्त्वाची व चिंतेची बाब आहे. गर्भवती महिलांमध्ये रोगप्रतिकार शक्ती कमी असल्याने संसर्गाचे प्रमाण अधिक असते. अशावेळी महिलांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. प्रसूतीकाळात ताप आल्यास महिलांनी तत्काळ डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावेत. तसेच शरीरातील रक्तपेशीही कमी होत असल्यास तत्काळ रक्तपेशी संक्रमित करून घेणे गरजेचे आहे. डॉक्टरांचा सल्ला घेऊनच औषधोपचार घ्यावा. ग्रामीण भागातील जनतेला आरोग्याच्या दर्जेदार सुविधा पुरविण्याचे काम आरोग्य विभाग करत आहे. चार वर्षांपूर्वी राज्यात १७५८ गरोदर मातांचा मृत्यू झाला होता. याची आरोग्य विभागाने दखल घेतली. त्यानुसार गर्भवती महिलांकरिता खास उपाय योजना करण्यास सुरुवात केली.गरोदर महिलांना वाहतूक, संदर्भसेवा, मोफत जेवण, औषधोपचार यांसह तपासण्या, लोहयुक्त गोळ्यांचे वाटप, तीव्र रक्तक्षय असलेल्या महिलांना लोहाचे इंजेक्शन, धनुर्वाताची लस आदि देण्यास सुरुवात केली़ यामुळे राज्यात माता मृत्यू दर कमी झाल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. पूर्वी अशा प्रकारच्या सुविधा मिळत नव्हत्या़दरम्यान, अजूनही शंभर टक्के प्रसूती या रु ग्णालयात होत नाहीत. भोंदू डॉक्टर किंवा अर्धशिक्षित डॉक्टरांकडून घरीच प्रसूती करून घेण्याचे प्रमाण ग्रामीण भागात मोठ्या संख्येने आहे. जमेल तसे प्रयत्न करायचे व नाहीच जमले तर रु ग्णास सरकारी दवाखान्यात सोडून द्यायचे, असे या भोंदू डॉक्टरांचे तत्त्व असते. त्यामुळे पात्र आणि अधिकृत डॉक्टरांकडूनच प्रसूतीदरम्यान तीन वेळा तपासणी, दिलेल्या १०० आयर्न कॅल्शियमच्या गोळ्या नीट घेणे तसेच महिलेला योग्य वेळेत रुग्णालयात आणून पात्र डॉक्टरांकडून प्रसूती करून घेणे महत्त्वाचे आहे़