वडाळीभोई : चांदवड तालुक्यातील बळीराजा पाऊस नसल्याने हवालदिल झाला आहे. त्यामुळे वडाळीभोई येथे गुरुवारी आठवडे बाजारावर मंदीचे सावट दिसून आले. बाजारात सर्वत्र शुकशुकाट असल्याचे जाणवले. वडाळीभोई बाजारपेठ नावाजलेली असून, वडाळीभोईला आजूबाजूचे धोडंबे, कानमंडाळे, भयाळे, गोहरण, शिंदे, भुत्याणे, खडकओझर, वाडी अशी अनेक गावांची ही बाजारपेठ असल्याने येथे व्यवसाय नेहमीच तेजीत असतात. राखी पौणर््िामेचा सण तोंडावर असतानाही वडाळीभोई आठवडे बाजारात शुकशुकाट होता. गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने अनेक ग्रामीण भागातून नागरिक बाजारास येताना दिसून आले नाही. पावसामुळे शेतकरी, शेतमजूर, व्यापारी यांच्यावर मोठा परिणाम दिसून येत असून, नागरिकांच्या हातात पैसा नसल्याने पुढील दिवस काढायचे कसे, असा प्रश्न शेतकरी, शेतमजुरांसमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे बाजारात मंदीचे सावट दिसून आले. शेतकऱ्यांची पावसाची आशा शेवटी बैलपोळ्याच्या सणापर्यंत असल्याने आतातरी वरुणराजाने कृपादृष्टी करावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. (वार्ताहर)
आठवडे बाजारावर मंदीचे सावट
By admin | Updated: August 30, 2015 23:36 IST