नाशिक : मनसेतील संघटनात्मक फेरबदल आणि अन्य काही कारणांमुळे नाराज असलेले आमदार वसंत गिते यांनी सोमवारी मुंबईत कृष्णकुंज येथे राज ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी वसंत गिते यांनी राज यांच्याजवळ आपल्या भावना व्यक्त केल्या; मात्र चर्चेचा तपशील गुप्त ठेवण्यात आला आहे.संघटनेतील फेरबदल, त्यानंतर स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडणुकीत दूर ठेवल्यानंतर गिते अस्वस्थ झाले होते. रविवारी राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आले तेव्हा गिते हे गुडघ्याला दुखापत झाल्याचे निमित्त करून अनुपस्थित राहिले; परंतु त्यांचे समर्थक नगरसेवक, कार्यकर्ते आणि पदाधिकारीदेखील अनुपस्थित होते. त्यानंतर तीन आमदार पाठवून राज यांनी काल गिते यांच्याशी चर्चा केली आणि गिते यांना विश्रामगृहावर बोलवून राज यांनी चर्चा केली. त्याच वेळी गुडघ्यासाठी मुंबईतील एका डॉक्टरांची वेळ घेऊन दिली होती. त्यानंतर गिते यांनीदेखील मंगळवारी मुंबईस गेल्यानंतर राज यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सांगितले होते. मंगळवारी गिते आणि सचिन ठाकरे यांनी कृष्णकुंज येथे जाऊन राज यांच्याशी चर्चा केली. तथापि, त्यानंतर गिते यांची भूमिका कळू शकली नाही. (प्रतिनिधी)