भारतीय किसान सभेच्या वतीने गुरुवारी (दि.३) दुपारी १ वाजेच्या सुमारास ॲड. दत्तात्रय गांगुर्डे , हनुमंत गुंजाळ, भास्करराव शिंदे, गणपत गुंजाळ , शब्बीर सय्यद, रामराव पारधे, तुकाराम गायकवाड, छबू पूरकर, लक्ष्मण आहेर, नामदेव पवार, दशरथ कोतवाल, नंदाबाई मोरे, ताईबाई पवार, अरुण वाघ यांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर जमून केंद्र सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली व प्रस्तावित कृषी कायद्याची होळी करण्यात आली. चांदवड तहसीलदार कार्यालयात जाऊन तहसीलदार प्रदीप पाटील यांना निवेदन दिले. केंद्र शासन हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यात दोन वयोवृद्ध शेतकऱ्यांना आपले प्राण गमवावे लागले. या कृत्यांचा जाहीर निषेध करीत केंद्र सरकारच्या या दडपशाहीला न जुमानता लाखो शेतकरी दिल्लीच्या सीमेवर ठिय्या देऊन गेली पाच दिवस बसले आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला दीडपट आधारभावाचे रास्त संरक्षण द्यावे, केंद्र सरकारने केलेले तीन शेतकरीविरोधी कायदे रद्द करावेत, शेतकरीविरोधी वीजबिल विधेयक पुढे रेटण्याचे कारस्थान बंद करा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करा,अशा प्रमुख मागण्यांचे निवेदन तहसीलदार प्रदीप पाटील यांना देण्यात आले. यावेळी चांदवड पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवला होता.
फोटो- ०३ एमएमजी १