नाशिक : विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्याने जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असून, शासकीय यंत्रणेनेही आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू केली आहे. ठिकठिकाणच्या तहसीलमध्ये आचारसंहितेसंदर्भात बैठका आयोजित करण्यात आल्या आहेत. गावागावांत उमेदवारीबाबत चर्चा रंगू लागल्या आहेत. विविध पक्षांतील इच्छुकांनी आधीपासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली असली तरी तिकीट मिळविण्याच्या स्पर्धेत आपण मागे राहायला नको यासाठी काळजी घेतली जात असून, प्रत्येकजन आपापल्यापरीने व्यूहरचना करत आहे. दरम्यान, सध्या पितृ पंधरवडा सुरू असल्याने त्यानंतरच उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेला वेग येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कार्यकर्त्यांच्या बैठका आणि इतर कामांमध्ये सध्या इच्छुक व्यस्त असल्याचे दिसून येते.मनमाड : विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्याने राजकीय रणधुमाळी सुरू झाली असून, २० सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असले तरी, सर्वत्र अशुभ मानला जाणारा पितृपंधरवडा सध्या सुरू असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी त्याचा अडसर निर्माण होणार आहे. बहुतांश उमेदवार सर्वपित्री अमावास्या संपल्यानंतर घटस्थापनेचा मुहूर्त साधण्याची शक्यता आहे.सध्या पितृपंधरवडा सुरू असून, या दिवसात स्वर्गाचे दार उघडले जाते आणि आपले मृत पूर्वज जेवायला येतात या भावनेतून घराघरांतून श्राद्ध घालण्यात येते. पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार पितृपंधरवड्यास अशुभ मानण्यात येत असल्याने या कालावधीत शुभ कामे करण्यात येत नाही. या परंपरा आजची तरुण पिढी मानत नसली तरी काही अंशी भीतीपोटी का होईना, पण या पंधरवड्यात नवीन वस्तू खरेदी करणे किंवा चांगले काम हाती घेण्यास कोणी धजावत नसल्याचे पहावयास मिळते. बहुतांश राजकारणी मंडळी राजकीय निर्णय मुहूर्त पाहून घेत असल्याचे दिसून येते. इतकेच काय तर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीसुद्धा कोणता दिवस व कोणती वेळ लाभदायक आहे हे पाहिले जात असल्याचा आजवरचा अनुभव आहे. नुकत्याच विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या असून, २० ते २७ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार आहे. याच कालावधीमध्ये पितृ पंधरवडा असून, त्यानंतर २५ तारखेला घटस्थापनेचा मुहूर्त बहुतांश उमेदवार साधणार असल्याचे बोलले जात आहे.येवला : विधानसभा निवडणूक जाहीर होताच छावा मराठा संघटनेने राज्यात २५ उमेदवार उभे करणार असल्याची घोषणा करीत निवडणुकीचा बिगुल वाजविला.संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विलास पांगारकर यांनी येवला येथे पत्रकार परिषद घेऊन येवला-लासलगाव विधानसभा मतदारसंघातून येवला तालुकाध्यक्ष नवनाथ अहेर हे उमेदवार असतील असे जाहीर केले. संघटनेची मजबुती व मजबुतीमधून राजकारण हा उद्देश असल्याचे पांगारकरांनी सागितले. आरक्षणाबाबात शिवसेनेने आपली भूमिका जाहीर न केल्यास सेनेच्या विरोधातही निवडणूक लढण्याचा इरादा त्यांनी स्पष्ट केला. (लोकमत चमू)४विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता निवडणूक विभागातर्फे जाहीर करण्यात आली, या पार्श्वभूमीवर इगतपुरी तहसील कार्यालयात तहसीलदार महेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला क्षेत्रीय अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी तहसीलदार पवार यांनी आदर्श आचारसंहितेचे नियम सांगून त्यावर अंमलबजावणी करण्याविषयी मार्गदर्शन केले. राजकीय पदाधिकाऱ्यांना आपल्या परिसरातील होर्डिंग्ज, बॅनर आदि काढण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. फिरते पथक, व्हिडीओ पाहणी, व्हिडीओ सर्वेक्षण, आचारसंहिता कक्ष आदि मंडळींना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. या बैठकीला पंचायत समिती माजी सभापती कावजी ठाकरे, दौलत बोंडे, बाळासाहेब धुमाळ, माजी उपनगराध्यक्ष सुनील रोकडे, राष्ट्रवादी शहराध्यक्ष प्रल्हाद जाधव यांच्यासह १६ क्षेत्रीय अधिकारी, नायब तहसीलदार संघमित्रा बाविस्कर, नायब तहसीलदार जितेंद्र केदारे, कृषी अधिकारी अजय सूर्यवंशी आदि उपस्थित होते.
उमेदवारीसाठी घटस्थापनेचा मुहूर्त
By admin | Updated: September 16, 2014 00:38 IST