कळवण : ओतूर येथील लघु पाटबंधारे प्रकल्पासाठी निधीची तरतूद, सप्तशृंगगडावरील प्रलंबित विकासकामे आणि पाणीटंचाईची समस्या, तालुक्यातील दुष्काळाची दाहकता, भेंडी, कुंडाणे (क), कातरगाव, मोहनदरी आदि गावांमध्ये भेडसावणारी पाणीटंचाई, पिण्याच्या पाण्यासाठी होणारी परवड यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करू, असे आश्वासन कळवण तालुका दौऱ्यावर आलेल्या पथकाने दिले. तालुक्यातील समस्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे मांडू व ओतूर प्रकल्पाला निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही भाजपाचे आमदार प्रभुदास भिलावेकर यांनी दौऱ्यादरम्यान दिली.मेळघाटचे भाजपाचे आमदार प्रभुदास भिलावेकर यांच्या समवेत भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, जिल्हा सरचिटणीस नंदकुमार खैरनार, तालुकाध्यक्ष सुधाकर पगार, कळवणचे तहसीलदार अनिल पुरे यांनी तालुक्याचा पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी ठिकठिकाणी भेटी देऊन कामांची व प्रलंबित कामांची पाहणी करून शेतकरी व अधिकारी वर्गाशी संवाद साधून समस्या जाणून घेतल्या.ओतूर येथील लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या कामाची पाहणी केली. प्रकल्पाचे काम सुरू असताना बंद का केले, असा जाब आमदार भिलावेकर यांनी यंत्रणेला विचारला. सात कोटी १२ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता असलेल्या या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करू व या कामाबाबतचा अहवाल मुख्यमंत्री व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना सादर करू असे पथकाने सांगितले. ओतूर प्रकल्पाला निधी मिळावा, यासाठी मुख्यमंत्रींना अशी विनंती करणार असल्याचे आमदार भिलावेकर यांनी सांगितले.कातळगाव व मोहनदरी येथे पिण्याचे पाणी नसल्याने आदिवासी जनतेची पाण्यासाठी परवड होत असून, पाणी प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी उपाययोजना करण्याची ग्रामस्थांनी मागणी केली. सप्तशृंगगडावर देशातून व राज्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येतात. चैत्रोत्सव व नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणात गर्दी असते. सप्तशृंगगडावर दरवर्षी फेब्रुवारीपासूनच तीव्र पाणी टंचाई जाणवते. भवानी पाझर तलावाची गळती थांबवण्यासाठी प्रलंबित प्रस्तावास शासनस्तरावरून मंजुरी द्यावी, चणकापूर धरणातून गाळ काढण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, यासाठी प्रयत्न करावे आदि विविध मागण्या आमदार प्रभुदास भिलावेकर यांच्याकडे करण्यात आल्या. विविध मागण्यांसाठी पाठपुरावा करावा, अशी विनंती कळवण तालुका भाजपाच्या वतीने आमदार प्रभुदास भिलावेकर यांना करण्यात आली.यावेळी भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, जिल्हा सरचिटणीस नंदकुमार खैरनार, तालुकाध्यक्ष सुधाकर पगार,भाजपचे उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष गोविंद कोठावदे, रमेश रावले, भाजपाचे शहराध्यक्ष निंबा पगार, भाजयुमो तालुकाध्यक्ष हेमंत रावले, कृष्णकुमार कामळसकर, ग्रा. पं. सदस्य सुरेश ढुमसे, शांताराम बागुल, अशोक पवार, बापू कुवर, दादा मोरे, रामकृष्ण पगार, दीपक खैरनार, मिलिंद कुवर, चेतन निकम, संदीप देवरे, पिनू भामरे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)
समस्या शासनापर्यंत पोहचविणार
By admin | Updated: May 7, 2016 22:32 IST