कळवण : दळवट परिसरात शनिवारी रात्री व रविवारी सकाळी भूकंपाचे धक्के बसल्याने परिसरातील आदिवासी बांधव भयभयीत झाले असून येथे शासनस्तरावरून येथे कायमस्वरूपी उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.परिसरात काल भूकंपाचे सौम्य धक्के बसल्यानंतर येथे जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार यांनी दळवट येथे बैठक घेऊन आदिवासी बांधवांना दिलासा दिला. महसूल वीज, पंचायत समितीचे अधिकारी उपस्थित होते.विद्युत पोल जीर्ण झाले असून ते बदलावे, भूकंप धक्क्यामुळे पोल पडून जीवित हानी घडण्याची शक्यता आदिवासी बांधवांनी बोलून दाखवली. दळवट परिसरातील भांडणे, कोसुर्डे, भाकुर्डे, जामले, दरेगाव, आमदर व वडाळा, जिरवाडे भागात शनिवारी रात्री व रविवारी (दि. ३) सकाळी १०.३० वाजेच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसल्याने परिसरातील आदिवासी बांधवांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यंत्रणा नसल्याने भूकंप नेमका किती रिश्टर स्केलचा बसला याची अधिकृत माहिती मिळू शकली नाही. दळवटचे सरपंच रमेश पवार, लक्ष्मण पवार , यशवंत पवार यांनी भूकंपाच्या ह्या धक्क्यामुळे आदिवासी बांधव भयभयीत झाले असल्याचे सांगितले.
दळवट परिरात हवी कायमस्वरूपी उपाययोजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 12:39 IST