नाशिक : काही दिवसांपूर्वी शहरातील सिन्नर फाटा भागात एका उसाच्या शेतात आढळून आलेल्या मादी बछड्याला आईने स्वीकारणे पसंत केले नाही. त्यामुळे त्याची रवानगी बोरीवलीच्या संजय गांधी राष्टÑीय उद्यानात करण्यात आली. या मादी बछड्याला ‘बिट्टू’ नावाच्या मित्राबरोबरच आता पालकही लाभले आहेत. वर्षभरासाठी उदरभरण आणि वैद्यकीय खर्चाचा प्रश्नही सुटला असून, हे शुभवर्तमान मानले जात आहे.शहरात २९ जानेवारी रोजी पळसे येथील एका उसाच्या शेतात ऊसतोडणीदरम्यान आढळून आलेल्या दोन पिलांपैकी एका पिलाला त्याची आई घेऊन गेली, मात्र सलग दोन दिवस प्रयत्न करूनही तिने पुन्हा हजेरी लावून दुसऱ्या मादी पिलाला स्वीकारले नाही. यामुळे या पिलाच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाल्याने अखेर वनविभागाने पुनर्भेटीचा प्रयोग थांबविला. त्यानंतर तत्काळ त्या मादी बछड्याला बोरीवलीच्या संजय गांधी राष्टÑीय उद्यानात संगोपनासाठी हलविले. तेथे या मादी पिलाची भेट येऊरच्या जंगलातून अशाच पध्दतीने आलेल्या बिबट्याच्या नर बछड्यासोबत झाली. या बछड्याला उद्यानाकडून ‘बिट्टू’ तर नाशिकच्या मादी पिलाला ‘दीदी’ अशी नावे देण्यात आली. बिट्टू अन् दीदीची चांगलीच गट्टी जमली आहे. दोघेही जवळपास सारख्याच वयाचे असल्यामुळे त्यांचा एकाकीपणा दूर झाला आणि हळूहळू शरीरही सुदृढ होऊ लागले आहे. अडीच महिन्यांत दीदीचे वजन ११०० ग्रॅमवरून अडीच किलो इतके झाले आहे.
आईपासून दुरावलेल्या ‘त्या’ बछड्याला लाभले पालक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2020 00:12 IST