नाशिक : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेने नाशिक सहकारी साखर कारखान्याच्या कामगार युनियनशी केलेल्या त्रिपक्षीय कराराला संचालकांचा तीव्र विरोध असून, हा करार म्हणजे नासाकाच्या येत्या गळीत हंगामासाठी मारक ठरणार आहे. याउलट बॅँकेने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कारखान्याला हंगामासाठी नऊ कोटींची मदत करावी, असे आवाहन माजी खासदार नासाकाचे अध्यक्ष देवीदास पिंगळे यांनी केले आहे.जिल्हा मध्यवर्ती बॅँकेने सकारात्मक दृष्टिकोन ठेवून कर्ज दिल्यास नाशिक साखर कारखान्याचा मागील वर्षी बंद पडलेला हंगाम यंदा सुरू होईल. बॅँकेने कामगार युनियनशी साखर विक्रीपोटी प्रतिपोते ३५० रुपये दरकरार निश्चित केला आहे. यातून कामगारांचे वेतन देण्याचे बॅँकेने जाहीर केले आहे. मात्र आजमितीस कामगारांच्या वेतनाबरोबरच नासाकाचा गळीत हंगाम सुरू होणे महत्त्वाचे आहे. त्यातही त्रिपक्षीय करारातील सातव्या क्रमांकावरील मुद्यात जिल्हा बॅँकेने कारखान्याने ४५ दिवसांत पूर्ण कर्जफेड करावी नाही, तर बॅँकेस कारखाना ताब्यात घेण्याचा व त्याची विल्हेवाट लावण्याचा पूर्ण अधिकार असेल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कामगार युनियनने सांगितल्यानुसार करारावर स्वाक्षरी केली, तर कारखाना मोठे कर्ज भरू शकत नाही. तसे झाले नाही तर बॅँक कारखाना ताब्यात घेऊन त्याची मनमानी पद्धतीने विक्री करण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा त्रिपक्षीय करार कामगार, सभासद व कारखान्याच्या हिताचा नाही. शिवाय पुढील गळीत हंगाम सुरू होण्याच्या दृष्टीने मारक आहे. त्यामुळे सभासद व कर्मचारी बांधवांनी सारासार विचार करून व्यवस्थापनास गळीत हंगाम सुरू करण्यासाठी सहकार्य व पाठबळ द्यावे, असे आवाहन देवीदास पिंगळे व संचालक मंडळाने केले आहे. (प्रतिनिधी)