कळवण : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेउन आपण एकीने निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची ग्वाही पक्षाच्या नेत्यांनी दिली आहे. श्रीसाई लॉन्सवर आयोजित या मेळाव्यास ज्येष्ठ विधिज्ञ शशिकांत पवार, जिल्हा परिषद गटनेते रवींद्र देवरे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष जयश्री पवार, जिल्हा बँक संचालक धनंजय पवार, जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, नगरपंचायत गटनेते कौतिक पगार, ज्येष्ठ नेते नारायण हिरे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारती पवार, प्रवीण पवार, उपसभापती संजय पवार आदि मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारती पवार यांनी मनोगत व्यक्त करताना केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीवर टीका करून नोटाबंदीमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आली असून, शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे, असे सांगून आम्ही सर्व एकसंघ आहोत, अशी ग्वाही दिली. जयश्री पवार यांनीही केंद्र व राज्य सरकारवर टीका करीत राष्ट्रवादीलाच संधी देण्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी शशिकांत पवार, गटनेते रवींद्र देवरे, नारायण हिरे, तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे यांनीही मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगतात जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार यांनी सांगितले की, तालुक्यात नवीन कामे करण्यात आमदार व खासदारांना अपयश आले आहे. सुरगाणा तालुक्यातील जनतेचा विकास ज्या खासदार व आमदाराला करता आला नाही ते काय कळवण तालुक्याचा विकास करतील असा सवालही त्यांनी केला. बैठकीला मधुकर भदाणे, कडू पाटील, मावंजी पाटील, रामा पाटील, केदा बहिरम, हरिभाऊ वाघ, अशोक पाटील, रामचंद्र गायकवाड, ज्ञानदेव पवार, देवेंद्र गायकवाड, शांताराम जाधव उपस्थित होते.
एकीने निवडणुकांना सामोरे जाणार
By admin | Updated: January 30, 2017 00:39 IST