चांदवड/सोग्रस : मुंबई-आग्रा रोडवरील वडाळीभोई उड्डाणपुला-जवळ आज (दि. १२) सकाळी ११ वाजेच्या सुमारास दोन दुचाकी व महिंद्र जीप यांच्यात झालेल्या अपघातात राधाकिसन सुतार हा युवक जागी ठार झाला, तर दोन जण जखमी झाले. चांदवडकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या महिंद्र एक्सयूव्ही गाडीने (क्र. एमएच १८ एजी ००४५) समोरून जाणाऱ्या दोन दुचाकींना (क्र. एमएच १५ एफसी ०७५३ व एमएच १७ डब्ल्यू ८१६४) धडक दिल्याने दुचाकी चालक राधाकिसन भोभाराम सुतार (२५, रा. शेखानगर, जि.जयपूर, राजस्थान) हा ठार झाला, तर पाठीमागे बसलेला राजेंद्र धिरेंद्र शर्मा (२२, रा. राजस्थान) व दुसऱ्या दुचाकीचा (क्र. एमएच १५ एफसी ०७५३) चालक विजय अण्णा सादडे (३५, रा. शिंदे, ता. चांदवड) हे दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर वडाळीभोई प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून अधिक उपचारासाठी नाशिक येथे पाठविण्यात आले. महिंद्र गाडीचा चालक अनंत बंग (रा.धुळे) याच्यावर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहायक पोलीस निरीक्षक चंदन इमले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कैलास जगताप अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)
वडाळीभोईनजीक अपघातात एक ठार
By admin | Updated: April 12, 2016 23:18 IST